मुंबई – विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त्यांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी अडकवून ठेवला आहे. या प्रकरणात राज्यपालांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे आणि या प्रलंबीत यादीला त्वरीत मान्यता दिली पाहिजे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना करण्यात आले आहे. शिवसेनेने पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात हीं मागणी करण्यात आली आहे.
भगतसिंह कोश्यारी हे भाजप नियुक्त राज्यपाल आहेत. त्यांनी विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या बारा आमदारांना मंजुरी देण्यास विलंब लावला आहे. त्यांची ही कृती घटना विरोधी आहे. राज्याचा राजदंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या हातात आहे. पण मुख्यमंत्री स्वत: राजधर्म पाळीत आहेत. म्हणून ते गप्प आहेत.
भारतीय जनता पक्षानेही या बाबतीतील आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी अपेक्षाहीं यात व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पीपणावर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की पुण्यात एका 23 वर्षीय मुलीने आत्महत्या केली त्यातून राजकीय कुभांड रचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे पण दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मात्र भाजपचे लोक असंवेदनशीलता दाखवत आहेत.
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र सरकारला साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे.