चंद्रकांत पाटील : एरंडवणे येथील छत्रे सभागृहात कंत्राटी कामगारांशी संवाद
पुणे – शेतमजूर आणि असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित करण्याचा आमच्या शासनाने प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील यांनी एरंडवणे येथील छत्रे सभागृहात कंत्राटी कामगारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयवंत भावे, भाजपचे नेते गणेश कळमकर, कंत्राटी कामगार संघटनेचे सचिन मेंगळे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात दोन कोटी शेतमजूर, तर तीन ते साडेतीन कोटी असंघटित कामगार आहेत. असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित करणे ही आमची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. असंघटित कामगारांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी “जॉब सिक्युरीटी’ सह किमान वेतन मिळणे गरजेचे आहे. यासाठी महायुतीचे सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. याअंतर्गत शेतमजूर आणि असंघटित कामगारांना पेन्शन योजना सुरू केली आहे. आगामी काळात इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
शहरातील असंघटित कामगारांना देखील भक्ती घरे किमान वेतन आणि इतर सर्व नागरी सुविधा देण्याबाबत आपण पावले उचलली आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची यापूर्वीच संवाद साधण्यात आला असून, त्याचा आराखडा देखील करण्याचे काम प्रगतिपथावर आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांचा प्रचारात सहभाग
प्रकाश जावडेकर यांनी कोथरूड परिसरातील विविध क्षेत्रातील नामवंतांबरोबर संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती दिली. तसेच संवाद प्रज्ञावंतांशी या कार्यक्रमात जावडेकर सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जावडेकर यांनी उपस्थितांना दिली. यामध्ये जीएसटी महसूल, उद्योगधंद्यांची आजची स्थिती, पर्यावरण आणि विकासाची सांगड अशा एकूणच विकास पर्वाबद्दलची माहिती दिली. गेल्या पाच वर्षांतील कामगिरी आणि या दुसऱ्या पर्वातील झालेली कामे यांचा त्यांनी लेखाजोखा मांडला. मेट्रोबरोबरच अनेक बाबी येत्या काही दिवसात दिसतील असेही जावडेकर म्हणाले. संवाद साधल्यानंतर प्रश्नोत्तरांद्वारेत्यांनी हा कार्यक्रम खुलवला. यावेळी संगणकतज्ज्ञ, चार्टर्ड अकाऊंटस्, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक तसेच रोटरी, लायन्स क्लबचे पदाधिकारी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छोट्या वस्त्यांमधून रिक्षातून प्रवास
कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी प्रचार फेरीदरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळांत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रिक्षातून प्रवास केला. प्रभाग क्रमांक 10 मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. यानंतर बालेवाडी येथील नियोजित रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभेला जाणे गरजेचे होते. गल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने पाटील यांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्त्रीनगर येथून रिक्षाने जात प्रचार केला. तसेच रिक्षाने मुख्य महामार्गापर्यंत प्रवास केला. यानंतर मुख्य मार्गावर गाडी आल्यानंतर बालेवाडीकडे प्रस्थान केले.