पिंपरी – करोनामुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या फेरीवाला व पथविक्रेत्यांना उभारी देण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ संबंधित विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक फिरत्या विक्रेत्यांचे व्यवसाय बंद पडले होते. अशा फिरत्या विक्रेत्यांसाठी, त्यांना उभारी देण्यासाठी महापालिकेने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. योजनेत पात्र ठरणारे फेरीवाले व पथ विक्रेते यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वतीने प्रति लाभार्थी 10 हजार रुपये इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केल्यास तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या पथ विक्रेत्यांना व्यवसाय करणे सोपे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. तरी लाभार्थी व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोरखे यांनी केले आहे.