रहाटणी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काही वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. परंतु महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रहाटणी येथे मागील काही दिवसांपासून पाण्याचा व्हॉल्वमधून पाणीगळती होत आहे. येथील गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रहाटणी येथील महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील पदपथाखालून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेली आहे. येथे व्हॉल्व काढण्यात आला आहे. परंतु या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. परंतु याकडे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. तर दुसरीकडे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने बहुतांश सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील पाणीगळतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी भावना एस. एन. कुंभार यांनी व्यक्त केली.