गुवाहाटी, दि. 20- एकीकडे आमचे सरकार सबक साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र घेउन काम करते आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष हा केवळ खोट्या आणि फसव्या घोषणांचा टेपरेकॉर्डर बनला आहे. त्यांच्या आश्वासनांची सत्यता सगळे देशाला माहिती आहे आणि समजतेही आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर प्रतिहल्ला केला.
आसाममधील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, हा तोच कॉंग्रेस पक्ष आहे ज्याने आसामच्या मूळ निवासींना जमीनीचा अधिकार देण्यासाठीही कधीच गांभीर्याने पावले उचलली नाहीत. येथील मूळ रहिवाशांना जमीनीचे पट्टे देण्याचे कार्य आमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले.
कॉंग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष याच वेळेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यापासून सावध राहावे असा सल्ला मोदींनी आसाममधील जनतेला दिला. गेल्या पाच वर्षांत आसामने जे काही मिळवले त्याची या लोकांना आता लूट करायची आहे. मात्र आपल्या फायद्यासाठी कॉंग्रेस कोणालाही पणाला लावू शकते याचे स्मरण ठेवले गेले पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आसामची अस्मिता, आसामची संस्कृती यांना ज्या पक्षापासून धोका आहे, त्याच पक्षासोबत कॉंग्रेस आज निवडणूक लढवतो आहे. चहाच्या मळ्यांत काम करणाऱ्या आपल्या बंधु भगिनींकडे याच लोकांनी कधीच लक्ष दिले नाही. एक चहावाला तुमच्या वेदना समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार असे भावनिक आवाहन करत त्यांनी कॉंग्रेसपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, टुलकीटचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले या टुलकीटबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. आसामचा चहा आणि आपल्या ऋषीमुनींद्वारे दिली गेलेली योग ही भेट आज जगभरात बदनाम करण्याचे प्रयत्न या टुलकीटद्वारे सुरू आहेत. असा कट रचणाऱ्यांना कॉंग्रेसने समर्थन द्यावे आणि मत मागण्यासाठी तुमच्याकडे यावे. आपण त्यांना माफ करू शकतो का, असा सवाल त्यांनी विचारला.