चिपळूण – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायानांच्या कारखान्यात शनिवारी (दि. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. दरम्यान घरडा केमिकल्स तर्फे मृतांच्या कुटुंबियांना 55 लाख रूपयांची तर जखमींना उपचारासाठी 20 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही आग एमआयडीसीच्या बंबांनी दोन तासानंतर आटोक्यात आणली.
घरडा कंपनीतील प्लांट क्रमांक 7मध्ये सकाळी आठ वाजता पहिल्या सत्रामध्ये काम करण्यासाठी रुजू झालेले अधिकारी आणि कामगार उत्पादन प्रक्रिया सुरू असतानाच अचानक झालेला स्फोट व त्यातून निर्माण झालेल्या भीषण आगीच्या कचाट्यात सापडले.
कनिष्ठ उत्पादन अधिकारी बाळासाहेब रामचंद्र गाढवे (49, खेर्डी, चिपळूण), संशोधन अधिकारी आशिष चंद्रकांत गोगावले (31, भागाडीगशिरळ, चिपळूण), मेंटेनस विभागात फिटर म्हणून काम करणारे महेश महादेव कासार (26, भरणे, खेड) व उप व्यवस्थापक राजेश फकिरा मानदकर (39, घरडा कॉलनी, पिरलोटे) या चार जणांचा या घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.
दि. 15 रोजी सुप्रिया लाईफ सायान्स कारखान्यात अपघात होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा एकदा लोटे औद्योगिक वसाहत स्फोटांच्या आवाजांनी हादरली. अभिजित सुरेश कवडे (वया 35, चिपळूण) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ऐरोली योथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
आगीवर एका तासात नियंत्रण मिळविण्यात आले. प्रथमदर्शनी हा एक अपघात आहे. अशा धोकादायाक परिस्थितीचे मूल्यामापन करुन त्यावर योग्य उपायोजना करणे चालू आहे. या आगीची कारणमीमांसा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली. कारखान्यातील सर्व संभाव्य धोकादायक स्थितीचे पुनर्परिक्षण केले जाईल. या क्लेशकारक परिस्थितीत जखमी सदस्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
घटनास्थळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजयराव कदम, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी सभापती शौकतभाई मुकादम, जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग आदींनी घटनास्थळी भेट दिली.
मृतांच्या वारसांना 55लाख
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्योकी 55 लाख रुपये देण्यात येतील. तर, जखमी कामगारांच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय खेड येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पयरावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला. सोबतच या ठिकाणी पोलीसांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष असेल. हा सर्व औद्योगिक परिसरावर सीसीटीव्हीद्वार निगराणी ठेवण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.