नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या काळात उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली होती. गेल्या एका वर्षात त्यांच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्यावर पीएम मोदींच्या जवळचे असल्याचा आरोपही करण्यात आले. अशातच टीव्ही वृत्त वाहिनीने गौतम अदानी यांच्याशी खास बातचीत केली. इंडिया टुडे ग्रुपचे ग्रुप एडिटोरियल डायरेक्टर (प्रकाशन) राज चेंगप्पा यांनी गौतम अदानी यांना सध्या चर्चेत असलेले सर्व प्रश्न विचारले.
या मुलाखती दरम्यान, गौतम अदानी यांना विचारण्यात आले की, तुमच्या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे का ? पीएम मोदींच्या जवळचे असल्याचा फायदा तुम्हाला होत असतो असे आरोप केले जातात यावर तुम्ही काय सांगाल ? या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे सोपे जाते. मी माझा औद्योगिक प्रवास चार भागात विभागू शकतो. अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की माझा प्रवास राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाला, त्यांनी एक्झिम पॉलिसीचा प्रचार केला आणि अनेक गोष्टी पहिल्यांदा OGL लिस्टमध्ये आल्या. यातून माझे निर्यात गृह सुरू झाले. तो नसता तर माझी सुरुवात अशी झाली नसती.
ते पुढे म्हणाले,’दुसरी संधी 1991 मध्ये आली जेव्हा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा सुरू केल्या. माझ्यासह अनेकांना त्याचा फायदा झाला. याबद्दल आधीच बरेच लिहिले गेले आहे. तिसरी संधी 1995 मध्ये आली जेव्हा केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत फक्त मुंबई ते दिल्ली हे NH-8 विकसित झाले होते, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धोरणातील बदलामुळे मला मुंद्रा येथे पहिले बंदर बांधण्याची संधी मिळाली. चौथी संधी 2001 मध्ये आली जेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये विकासाची दिशा दाखवली. त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये अविकसित भागांच्या विकासाबरोबरच आर्थिक बदलही झाला. त्यातून उद्योग आणि रोजगाराचा विकास झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करत आहेत.’
माझ्या विरोधात अशा गोष्टी बोलल्या जातात हे दुर्दैव आहे. हे सर्व निराधार आणि आपल्या प्रगतीच्या विरुद्ध पक्षपाती आहे. सत्य हे आहे की आपले यश हे कोणा एकामुळे नाही तर तीन दशकात अनेक सरकारांच्या धोरणात्मक बदलांमुळे आहे. असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.