नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाची सर्वच बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आम्ही कोणताही प्रचार करू शकत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना निधी देऊ शकत नाही. आम्ही आमच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ शकत नाही. विमान सोडा, आमचे लोक रेल्वे प्रवासाचे तिकीटही काढू शकत नाहीत. निवडणुकीच्या दोन महिने आधी ही कारवाई करण्यात आली असल्याने केंद्र सरकारचे सूडबुद्धीचे राजकारण यातून दिसून येत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी यांनी केला आहे.
पक्षाची बँक खाती गोठवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह कोषाध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी राहूल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याची ही कृती आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री हेच यामागचे सूत्रधार आहेत.भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे ही कल्पनाच खोटी आहे. भारतातील २०% लोक आम्हाला मत देतात आणि या क्षणी आम्ही कुणालाही दोन रुपये पण देऊ शकत नाही. निवडणुकीत आम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठीच ही व्यवस्था करण्यात आली आहे.
आर्थिक स्थिती कमकुवत करण्याचे षडयंत्र – सोनिया
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, या प्रकरणाचा आपल्या लोकशाहीवरही परिणाम होतो. काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा पंतप्रधान सातत्याने प्रयत्न करत आहेत. पक्षाच्या खात्यात जनतेकडून पैसे जमा आहेत. आमच्या खात्यातून जबरदस्तीने पैसे काढले जात आहेत.
मात्र, या सर्व आव्हानात्मक परिस्थितीतही आम्ही आमचा निवडणूक प्रचार जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. इलेक्टोरल बाँड्सला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. भाजपला इलेक्टोरल बाँड्सचा मोठा फायदा झाला. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसची आर्थिक स्थिती कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
राजकीय पक्षांना समान संधी द्यावी : खर्गे
सुरुवातीला मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका निष्पक्षपणे पार पाडणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. ईडी, आयटी आणि इतर केंद्रीय संस्थांवर कोणाचेही नियंत्रण नसावे. गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर इलेक्टोरल बाँड्सची आकडेवारी सार्वजनिक झाली असून त्यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केले आहेत. त्या योजनेंतर्गत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मिअळवला. दुसरीकडे, एका षड्यंत्राचा एक भाग म्हणून, मुख्य विरोधी पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. भाजपने काही कंपन्यांकडून पैसे कसे घेतले हे आता सर्वांना समजले आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची चौकशी करत असल्याने लवकरच सत्य आपल्या समोर येईल.
काँग्रेसला अनियमिततेसाठी मोठाकोषाध्यक्ष दंड : माकन
काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, हा भारतातील लोकशाहीवरही हल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे, मग काँग्रेसला का दंड ठोठावला जात आहे आणि तोही निवडणुकीपूर्वी? शिक्षा इतकी गंभीर होती की काँग्रेसला .07% अनियमिततेसाठी 106% दंड ठोठावण्यात आला. आमच्या बँक खात्यातून आयटी आणि सरकारकडे 115 कोटी रुपये हस्तांतरित केले.