जळोची – जाती धर्माच्या भिंती ओलांडून गौरी- गणपतीची प्रतिष्ठापना केल्याने बारामतीमधील मुस्लीम कुटुंबाचे कौतुक होत आहे. शेख कुटुंब हे गेल्या आठ वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना करीत आहे.
गणपतीवर त्यांची श्रद्धा आहे. आता यावर्षी शेख कुटुंबाने गौराई बसवल्या होत्या. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावे, असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.
बारामतीमधील शेख कुटुंब हे कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावामध्ये न अडकता हिंदू धर्माचा महत्वाचा सण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या आठ वर्षांपासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्या श्रद्धेने गणपतीची आराधना करीत आहेत.
यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या होत्या. शेख कुटुंब हे सहा जणांच असून शिकंदर शहाबुद्दीन शेख, आलिमा सिकंदर शेख, कईम सिकंदर शेख आणि मोहम्मद सिकंदर शेख गुण्या गोविंदाने राहतात.
शेख कुटुंबीय हे 25 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्टी या गावात काम करीत असताना त्यांच्या वडिलांना गौराईचे मुखवटे सापडले होते. तेव्हापासून गौराईची स्थापना इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात करीत होते. यावेळी त्यांच्या सलोख्याचे कौतुक होत आहे.
सामाजिक विषमतेची चौकट भेदली
एकीकडे अवघ्या देशभरात हिंदू- मुस्लीम असे राजकारण होत आहे. सामाजिक विषमता निर्माण केली जात आहे. मात्र, शेख कुटुंबाने हिंदू सणाद्वारे हिंदू- मुस्लीम एकता निर्माण केली आहे. सामाजिक विषमता करणाऱ्यांची चौकट या कुटुंबीयाने भेदून एक सलोख्याचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत. कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशाच रीतीने हिंदू मुस्लिम एक राहिल्यास एकमेकांच्या जाती- धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, अशी प्रतिक्रिया शेख कुटुंबीयांनी दिली.