नागपूर – कर्नाटकच्या अलमट्टी धरणात अडवले जाते. या धरणात पाणी अडवल्याने सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने वेळीच पाउले उचलली नसल्याने येथील पूरपरिस्थिती आणखीन गंभीर झाली. तसेच पूरग्रस्त लोकांना कुठलीही तातडीने मदत देण्यात आली नाही. एकीकडे पूर परिस्थिती निर्माण होत असताना भाजप आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी यात्रेत सहभागी होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
पूरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी म्हणून खावटी देण्यात येते ती अद्यापही देण्यात आलेली नाही. आमदार, मंत्री पूरग्रस्त भागात भेटी देत असल्याने प्रशासन त्यांच्यामागे फिरत आहे. परंतु पूरग्रस्तांना मदत मिळत नाही, असेही ते म्हणाले.
मंत्री पर्यटन करायला जातात. ते पूर परिस्थितीबद्दल गंभीर नाहीत, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांना टोला लगाविला. अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरात अडकले असताना सरकारकडे निवडणूक प्रचाराच्या कामासाठी पैसे आहेत. मात्र दुष्काळग्रस्त भागाला मदतीसाठी निधी का नाही? असा सवालही त्यांनी विचारला.