नवी दिल्ली : कोरोनाच्या लढतीत माहिती प्रसार करण्याची अत्यंत मौल्यवान कामगिरी मुद्रित माध्यमांनी बजावली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माहिती प्रसारण करण्यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली. वर्तमानपत्रांचे जाळे छोटे खेडे आणि शहरांत सर्वत्र पसरले आहे. त्यामुळेच या आव्हानाचा मुकाबला करताना अगदी दूर्गम भागातही योग्य माहिती देण्याची महत्वपूर्ण भूमिका माध्यमांनी पार पाडली. वर्तमानपत्रांची विश्वासाहर्ता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या त्या विभागात त्याची स्थानिक पाने लोकांकडून मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. त्यामूळे त्या पानावर कोरोनाबाबतची माहिती आणि लेख छापणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.
चाचणी केंद्रे कोठे आहेत, चाचणी कोण करू शकतो, चाचणी करण्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा आणि घरी विलगीकरणाची आचार संहिता याची माहिती जनते पर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू कोठे मिळतील, यासारखी माहिती द्यावी, असे सुचवून पंतप्रधान म्हणाले, सरकार आणि जनतेतील सेतू बनण्याचे काम माध्यमांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरही करावे.
सोशल डिस्टंन्सिंगचे महत्व अधोरेखीत करत ते म्हणाले, त्याचे महत्व आणि राज्यांनी लादलेल्या संचारबंदीची आवश्यकता लोकांना समजावून सांगा, असे ते म्हणाले.