मनस्विनी साखरदांडे
एकदा पृथ्वीवरची मंडळी आपापल्या अडचणी, दुःखं, काळजी ह्यांनी फार वैतागली. प्रत्येकाला वाटायचे, हे सारे माझ्याच वाट्याला का? किती दुःखं भोगायची मी? बाकीचे किती मजेत आहेत… मला मात्र फक्त दुःख आणि दुःख! मग ते सगळे आपापल्या दुःखांचे, त्रासांचे गाठोडे घेऊन देवाकडे गेले.
प्रत्येकजण देवाकडे तक्रार करू लागला की, “देवा, तू इतरांना मात्र सुखच सुख देतोस. सगळे आरामात असतात. माझ्यावर मात्र दुःखं, संकटं ह्यांचा भडिमार करीत असतोस. माझ्याकडच्या दुःखाचे गाठोडे परत करायला आणले आहे. ते घे आणि एखादे साधेसुधे, हलके गाठोडे मला दे.’
देव म्हणतो, “ठीक आहे. आपापली गाठोडी इथे ठेवून द्या.’ सगळ्यांनी पटापट आपापली ओझी उतरवून ठेवली. देवाने त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावले. सकाळी सगळे जमल्यावर देवाने एकत्र ठेवलेली ती गाठोडी सर्वांना दाखवली आणि सांगितले की, “प्रत्येकाने आपल्याला जे गाठोडे पेलेल, झेपेल ते उचलावे आणि घेऊन जावे.’
प्रत्येकाने एकेक गाठोडे उचलले. उघडून बघतात तर काय? ते त्यांचे आधीचेच गाठोडे होते. देव हसला आणि म्हणाला, “मी प्रत्येकाची कुवत जाणून आहे. ज्याला जेवढे झेपेल तेवढेच दुःख मी दिले आहे. जे दुःख मी तुम्हाला दिले आहे, ते सहन करण्याची, त्याला तोंड देण्याची ताकदही मी तुम्हाला दिली आहे. म्हणूनच ते गाठोडे तुम्हाला उचलावेसे वाटले.’
सगळेजण मुकाट्याने आपापली गाठोडी परत घेऊन आले. मात्र आता त्यांना आत्मविश्वास आलेला होता की, काहीएक विचार करूनच देवाने मला हे गाठोडे दिले आहे. तेव्हा मी हा त्रास, दुःखे, अडचणी सारे काही जीवनात निभावून नेईल. कारण माझ्या अंगी तेवढी ताकद, सहनशीलताही नक्कीच आहे.
थोडक्यात, आपले ओझे आपणच वाहायचे असते. आपल्या वाट्याला आलेले भोग भोगूनच संपवायचे असतात. जीवनात सुख आणि दुःख हा खेळ तर चालतच राहणार. खेळ खेळायचा तर आहे; पण माझ्यावर कधीच राज्य येता कामा नये असे म्हणणे बरोबर आहे का? हा खेळ जिंकणे ही वेगळी गोष्ट आहे, पण आधी तो चांगला खेळून तर बघू या! लंगडी खेळताना मी फक्त पळणार; लंगडी कधी घालणारच नाही असे करून कसे चालेल? असा डाव खेळण्यात काय मतलब? आणि इतरांशी तुलना करायचीच कशाला? आपल्याला ज्या व्यक्तीचा हेवा वाटतो आहे, त्याची सगळी दुःखे, सल आपल्याला कुठे माहीत आहेत? कदाचित ती व्यक्ती तुमचा हेवा करीत असेल. तेव्हा आपल्या वाट्याला जे आले आहे, त्याचा धैर्याने सामना करणे उत्तम!