मुंबई कुणाची? या प्रश्नावर सार्वमत होऊं द्या
मुंबई, ता. 28 : “”मुंबईचा वाद हा परस्पर-विचारविनिमयानें व सामोपचारानें व सार्वमतानें सोडविला पाहिजें. मुंबईतील सर्व भाषिक जनतेंच्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची एकमुखी मागणी केल्यास पंडित नेहरू त्या मागणीला आडकाठी घेणार नाहीत,” अशा आशयाचे विचार कामगार नेते श्री. ना. म. जोशी यांनी हिंद सेवक समाजाच्या जागेंत “भाषिक राज्य रचनेंत मुंबईचें स्थान’ या विषयांवर बोलतांना प्रकट केले.
लोकशाहीचा मार्ग…
बॉम्बे सिव्हिक असोसिएशनतर्फे भरलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. जमनादास मेहता होते. श्री. ना. म. जोशी आपल्या भाषणांत पुढें म्हणालें, “”भाषावार प्रांतरचना व्हावी अशा मताचा मी आहें. बहुसंख्य जनतेची जी भाषा आहें त्या भाषेतून राज्याचा कारभार चालला पाहिजें. लोकशाहीचा मी पुरस्कर्ता असल्यामुळें राज्य कारभारांत लोकांना अधिकार असला पाहिजे.
मुंबईचे भाषिक राज्यांत स्थान कोणते याचा विचार केला असतां मुंबई ही ऐतिहासिक व भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राशींच संलग्न आहें यांत वाद नाही, तरीसुद्धा मुंबईचे भवितव्य ठरवितांना मुंबईच्या जनतेचा कौल घेतला पाहिजें, म्हणजें सार्वमत घेतले पाहिजें या मताचा मी आहें. सार्वमतानें येथील जनतेनें मुंबई स्वतंत्र असली पाहिजें असें ठरविले तर तो कौल मी मान्य करीन. परंतु सार्वमताखेरीज जनतेवर सक्तीने आपले मत व विचार लादण्याचा कुणीहि प्रयत्न करू नयें.”
प्रा. डी. आर. घारापुरे यांचे भाषण-
मुंबई महाराष्ट्राचीच
आपण शिरगणतीकडे पाहिलें तर मुंबईत मराठी लोकांची संख्या अधिक आहें हे दिसून येईल. 48 टक्के मराठी आहेत व गुजराथी फक्त तीस टक्के आहेत. मुंबईवर मराठ्यांचा हक्क आहें. वास्तविक मुंबईचे वैभव आम्ही वाढविलें असें जे गुजराथी बोलतात त्या बोलांत काहीच तथ्य नाही. लोकसंख्येचा विचार केला असतां मुंबई ही महाराष्ट्राचीच आहें.
वास्तविक माझ्या अंतःकरणांत गुजराथी-महाराष्ट्रीय असा भेदभाव नाही. कारण आपण दोघे भारतीय लोकसत्ताकाचे नागरिक आहोत ही भावना माझ्यात आहें. गुजराथी व्यापाऱ्यांनी येथेच राहावे, खुशाल व्यापार करावा; व महाराष्ट्राची धनसंपत्ती वाढवावी. त्यांना चालते व्हा म्हणून कुणीही सांगणार नाही.