-माधव विद्वांस
अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती जयश्री गडकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म कारवार जिल्ह्यातील, सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात 21 मार्च 1940 रोजी झाला. त्या वयाच्या सहाव्या वर्षीच मुंबई येथे कुटुंबीयांसमवेत आल्या. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथेच पार पडले.
शिक्षणाची आवड असूनही त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. त्यांना गाण्याची व नृत्याची आवड होती. गोड गळा आणि तालासुरांचे उपजत ज्ञान यामुळे त्यांना गायनाचीही आवड होती. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या.
जयश्री यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून हौशी रंगमंचावर पाऊल ठेवले. याचदरम्यान त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या. “झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटासाठी व्ही. शांताराम यांना एका समूहनृत्यात सहनर्तिका हव्या होत्या.
सप्तरंगी हिंदी चित्रपटातील समूहनृत्यामध्ये त्यांनी भाग घेतला. या नृत्याने त्यांना “दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात एका नृत्यासाठी काम मिळाले. मात्र, यापुढे केवळ नृत्य करण्यापुरती भूमिका करायची नाही, असे त्यांनी ठरवले. यानंतर “गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना प्रथमच भूमिका मिळाली. 21 मार्च 1956 या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
योगायोगाने याच दिवशी त्यांचा 16 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर वर्ष 1957 मध्ये फिल्मिस्तानचे “आई मला क्षमा कर’ आणि “पहिलं प्रेम’ या दोन चित्रपटांतून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. वर्ष 1957 मध्ये फिल्मिस्तानचा “आलिया भोगासी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात जयश्री यांनी राजा गोसावींबरोबर प्रमुख भूमिका केली. यावेळी रमेश देव, दादा साळवी, सूर्यकांत, सीमा, राम टिपणीस, दीनानाथ या दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी अभिनय केला. नंतरच्या कारकिर्दीत राजा गोसावींबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतून नायिकेच्या भूमिका केल्या.
वर्ष 1959 मध्ये “सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविला. यामध्ये जयश्री यांनी तमासगिरीणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला “सुपरहिट’ चित्रपट ठरला. या चित्रपटातील जयश्री यांच्या “बुगडी माझी सांडली गं…’ या गाण्यावरील लावणीनृत्याने मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्या पुढे आल्या. ही लावणी आजही टीव्हीवरील लावणीनृत्य कार्यक्रमांमध्ये सादर केली जाते.
याच चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना “रसरंग पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही व पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान अढळ ठेवले. त्यांनी तमाशापटांबरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाचे चतुरस्त्र स्वरूप प्रेक्षकांना दाखवून दिले.
मराठीबरोबर त्यांनी “एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर नायिकेची भूमिका असलेला “प्रायव्हेट सेक्रेटरी’ हा त्यांचा चित्रपट रसिकांना खूपच भावला. हिंदी चित्रपटसृष्टीत धार्मिक, पौराणिक चित्रपटांत त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तसेच “सारंगा’ चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत झालेले “तेरी याद में…’ हे गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 250 चित्रपटांतून भूमिका केल्या.”जगन्नाथाचा रथ’ या चित्रपटाचे नायक बाळ धुरी यांच्याशी 1975 साली त्यांनी विवाह केला.
शहरी तसेच ग्रामीण, मराठमोळ्या मराठी बोलीभाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. रामानंद सागर यांच्या “रामायण’ या दूरदर्शनवरील मालिकेत या दांपत्याने दशरथ-कौशल्येची भूमिका साकारली. रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचे 29 ऑगस्ट 2008 रोजी निधन झाले.