नवी दिल्ली, ता. 20 – सन 1957च्या सुरुवातीस देशात जी सार्वत्रिक निवडणूक झाली ती लोकशाहीच्या दृष्टीने मोठी यशस्वी झाली. राजकीय पक्ष-उमेदवार यांनी निवडणूक यशस्वी करण्यास हातभार लावला, असे निवडणूक कमिशरनी सादर केलेल्या प्रतिवृत्तांत म्हटले आहे.
हा अहवाल आज लोकसभेपुढे मांडण्यात आला. अहवालात पुढे म्हटले आहे की- पहिल्या निवडणुकीत जो उच्च दर्जा प्रस्थापित झाला होता तोच याही निवडणुकीत सांभाळण्यात आल्याने स्वतंत्र व खुल्या निवडणुकी भारतात होऊ शकतात हे सिद्ध होऊन चुकले आहे, असे म्हणण्यास आता प्रत्यवाय उरलेला नाही. मागास जमातीचे लोकांनाही मतदानांत राजकीय जागृतीचे दर्शन घडवले आणि भारतीय जनता राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याचा पडताळा आला, असे निःपक्षपाती निरीक्षकांनाही पटले. निवडणूक कायद्याची अनेक मतदारांना माहिती नसतानाही ते शांततेने मतदान केंद्रावर गेले आणि शिस्तीने मतदान केले.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील उरलेले कवित्व!
नवी दिल्ली – गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे वेळी ज्या गमतीजमती झाल्या त्यासंबंधी माहिती निवडणूक कमिशनरांचे अहवालात संकलित करण्यात आली आहे. मद्रासमध्ये मतदान करणाऱ्या एका वृद्ध स्त्रीने मतपत्रिका टाकताना असे म्हटल्याचे ऐकू आले- “बाई पत्रिके, एखाद्याला राजा वा मंत्री करणे तुझ्या हाती आहे. तेव्हा आम्हाला निदान पूर्वीसारखा स्वस्त तांदूळ तरी दे म्हणजे झाले!’
बिहारमध्ये असाच एक गमतीचा प्रकार घडला. एका वृद्ध स्त्रीने प्रथम नेहरूंचे दर्शन मागितले. पंतप्रधान तेथे येऊ शकत नाहीत हे तिला पटवणे भारी मुश्कील झाले. अखेर तिने मतदान केले. आंध्र-मध्य प्रदेशातील काही मतदान केंद्रास वाघ-चित्त्यांनी भेटी दिल्या. मध्य प्रदेशातील जंगलाजवळच्या एका मतदान केंद्रापाशी एक चित्ता आला आणि डरकाळ्या फोडू लागल्या. मतदार घाबरले व पळून गेले. त्यामुळे मतदान अर्धा तास बंद पडले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मतदानस्थिती पूर्ववत झाली.