मुंबई – महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समित्यांनी ठरवलेले जीवनावश्यक वस्तूंचे दर कायदेशीर ठरावेत म्हणून भारत संरक्षण कायद्याचा अंमल जारी केला आहे. साखर, खाद्य तेले, डाळी, भाजीपाला, मटण, मासे, अंडी, कांदे, बटाटे व मिठाई या वस्तू रास्त दरात विकण्यास विक्रेत्याने नकार दिल्यास या कायद्याच्या खाली उपरोक्त वस्तू जप्त केल्या जाणार आहेत. या कायद्याखाली अटक केलेल्यांना कमीतकमी 3 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येईल.
देशाची आर्थिक परिस्थिती दुर्गम
हैदराबाद – जनतेला तसेच खासगी क्षेत्रांना सारखेच लागू होईल असे किमतीचे व पगाराचे धोरण सरकारने जाहीर करावे. त्यामुळे किमतीतील वाढ व पगारांची वाढ या दोन्हीमध्ये निर्माण होणारे प्रश्न सुटले जातील, अशी सूचना जनसंघाचे लोकसभेतील नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी केंद्र सरकारला केली.
वॉटरगेट प्रकरणाशी माझा संबंध नव्हता व नाही
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी रेडियोवर व टेलिव्हिजनवर भाषण करून असे जाहीर केले की, वॉटरगेट प्रकरणी मला काहीही माहिती नव्हती व मी त्यात कोणत्याही तऱ्हेने सहभागी नव्हतो. किंवा त्या प्रकरणावर पुढे जी सावरासावर करण्यात आली त्या गोष्टीशीही माझा संबंध येत नाही. ज्या तऱ्हेने माझी निंदानालस्ती केली त्यामुळे लोकांचा शासनावरील विश्वास उडून जाईल.
पॉंडेचरीत देशातीलपहिले शेतकी विज्ञान केंद्र
नवी दिल्ली – पॉंडेचरी येथे देशातील पहिलेच कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येईल. हे केंद्र तामिळनाडू शेतकी विद्यापीठाचे अखत्यारित असेल, असा निर्णय भारतीय शेतकी संशोधन मंडळाने घेतला. कोरडवाहू शेती, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय, बागाईत याबाबत अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण या केंद्रातून देण्यात येईल.