ख्यातनाम शिक्षण प्रसारक, संपादक, लेखक, विचारवंत व पुण्याचे महापौर बाबुराव गणपत जगताप यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1888 रोजी पुणे येथे झाला. दुर्दैवाने 1897 च्या प्लेगच्या साथीने त्यांचे आईवडिलांचे छत्र हरपले.
त्यांचे शिक्षण नूमवि व फर्गसन महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांनी चित्रकला व क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळविले. त्यांच्यावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा वैचारिक प्रभाव होता. कष्टकरी बहुजन समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तसेच अंधश्रद्धेचा पगडा कमी होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व लक्ष्मणपंत ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली.
शिक्षण घेण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घेणे अशक्यप्राय होते. म्हणून वाचनालय चालविणे, विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणे सुरू केले. या उपक्रमातूनच पुढे “मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड’ व “महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ’ या संस्था स्थापन झाल्या. दरम्यान मुंबई येथे त्यावेळची माध्यमिक शिक्षक पात्रतेची “बीटी’ ही पदवी प्राप्त केली.
बी.ए. झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे काही दिवस शरीररक्षक म्हणून काम केले. शिक्षण व समाजसेवेची आवड असल्यामुळे ते बडोद्यात रमले नाहीत. नोकरी सोडली व ते पुण्यास परतले. “बहुजन समाजाच्या उन्नतीप्रीत्यर्थ’ हे ध्येयवाक्य घेऊन वर्ष 1918 मध्ये शुक्रवार पेठेत एका खोलीत “श्री शिवाजी मराठा शाळा’ सुरू केली. त्यावेळी फक्त तीस विद्यार्थी होते.
अध्यापन, शाळेची स्वच्छता, घंटा देणे यांसारख्या छोट्या मोठ्या गोष्टी ते स्वतः करायचे. “आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले’, या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत श्री शिवाजी मराठा शाळेला नावारूपाला आणले. त्यासाठी स्वत: आर्थिक झळ सोसून कार्य नेटाने चालू ठेवले. त्यांच्या या कार्यास मदत करण्यास अनेकांचे हात पुढे आले. त्यातूनच काही ध्येयवादी तरुण पुढे सरसावले व “श्री शिवाजी मराठा सोसायटी’ या संस्थेची स्थापना झाली.
नुसती शिक्षणसंस्था स्थापन करूनच ते थांबले नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर शिक्षकांसाठीही मार्गदर्शन करणारे “शिक्षक’ हे मासिक 1920 साली सुरू केले व अव्याहतपणे 44 वर्षे चालविले. “मन्वंतर वाचनमाला’ सुरू करून इ. 1 ली ते 7 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बहुविध ज्ञानाची ओळख करून दिली. “टॉलस्टॉयच्या गोष्टी’, “भारतीय शिक्षणाचा इतिहास’, “शाळा कशी चालवावी’, “माझी शाळा’ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
“प्रार्थना समाजा’चे अध्यक्ष, “पुणे जिल्हा स्कूलबोर्डा’चे अध्यक्ष, “बालवीर चळवळ’ पुणे जिल्ह्याचे प्रमुख, “लोकशिक्षण समिती’चे अध्यक्ष, “कोल्हापूर संस्थान’चे प्रमुख शिक्षणाधिकारी, “गारगोटी शिक्षण संस्थे’चे कार्यकारी अधिकारी, “श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या कारभारी मंडळात सदस्य, क्रमिक पुस्तक समितीचे सल्लागार अशी अनेक पदे भूषविली व सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
पुण्याचे महापौर असताना स्वतः वेळेत येऊन साध्या राहणीने सर्व कर्मचाऱ्यांना शिस्तही लावली होती. बाबुराव घरून बिस्किटे घेऊन येत असत आणि महापालिकेत स्वखर्चाने चहा-कॉफी मागवत. 1 ऑक्टोबर 1978 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस