भारत अणुबॉंब बनवीत असल्याचा आरोप निराधार
नवी दिल्ली, दि. 12 – भारत आपल्या शेजाऱ्यांना धमकाविण्यासाठी अणुबॉंब व हायड्रोजन बॉंब बनवीत आहे, हा पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो यांनी आपल्या परदेश दौऱ्यात नुकताच केलेला आरोप निराधार, आश्चर्यकारक व निराशाजनक आहे, असे आज राज्यसभेत परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारताबरोबर संबंध सुरळीत करण्याची पाकिस्तानची खरोखरच इच्छा आहे की नाही याबद्दल भारताला संशय आहे. भारताने अनेकदा पाकिस्तानसोबत संबंध सुरळीत करण्यास प्राधान्य दिले आहे.
व्याजदर साडेसोळा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये
मुंबई – व्यापारी बॅंकांनी व्याजाचा दर साडेसोळा टक्क्यांपेक्षा जास्त आकारू नये असे बंधन रिझर्व्ह बॅंकेने घातले असून ते 15 मार्चपासून अंमलात येईल. सध्या असे काही बंधन नाही. काही बॅंका तर 18 ते 19 टक्के व्याजदर घेतात. बॅंक रेट व कमाल व्याजदर यांच्यात अधिक जुळणारा संबंध असावा, म्हणून हे बंधन घालण्यात आले आहे.
बॅंक रेट 9 टक्केच राहील; ठेवीवरील व्याजाचे दरही बदलणार नाहीत. कर्जावरील व्याजाचा किमान दरही पूर्वीप्रमाणे साडेबारा टक्केच राहणार आहे.