नाना फडणवीस यांचे आज पुण्यस्मरण (13 मार्च 1800) नाना फडणवीसांचा जन्म सातारा येथे 12 फेब्रुवारी 1742 रोजी झाला. त्यांचे कारभारी शिक्षण नानासाहेब पेशवे यांच्या बरोबरच सातारा येथे झाले.
इतिहासकार गमतीने उत्तरपेशवाईतील चार प्रमुख मुत्सद्यांना साडेतीन शहाणे म्हणत. त्यापैकी नाना फडणवीस-अर्धा. कारण ते तलवारबाहद्दर नव्हते म्हणून अर्धे मानले जायचे; पण ते मुत्सद्दी होते.
काहींच्या मते 1) महादजी शिंदे 2) सखारामबापू 3) हरिपंत फडके आणि 1/2) नाना फडणवीस असे साडेतीन आहेत तर काहींच्या मते 1) महादजी शिंदे 2) सखारामबापू 3) विठ्ठल सुंदर आणि 1/2) नाना फडणवीस असे साडेतीन आहेत. तर जिवाजीपंत चोरघडे यांचेही नाव घेतले जाते.
नाना फडणवीस हे बाणकोट जवळील वेळास गावातील भानू घराण्यातले. बाळाजी विश्वनाथ यांना जंजिऱ्याच्या सिद्दीने तुरुंगात टाकले होते त्यावेळी भानूंच्या कुटुंबाने त्यांना सोडविण्यासाठी खटपट केली त्यामुळे बाळाजींचे आणि भानू कुटुंबाचे संबंध दृढ झाले. पुढे बाळाजींबरोबर कोकणातून नशीब जमवण्यासाठी जी कुटुंबे आली त्यात रामजी महादेव भानू पण सातारला आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे झालेवर हरी महादेव भानू यांची फडणविसी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या घराण्यात कर्तृत्वाने ही फडणविसी चालू राहिली ती नाना फडणवीस यांच्या अखेरपर्यंत. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत नाना फडणविसीपदी 29 नोव्हेंबर 1756 रोजी आले.
नाना फडणवीस यांचे कर्तृत्व बारभाईंचे कारस्थानात दिसून आले. रघुनाथरावाने कारस्थानाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न हणून पाडण्यासाठी पेशवाईतील 12 मुत्सद्दी एकत्रित आले व रघुनाथरावांचे मनसुबे उधळले गेले. यामधे नाना फडणवीस, हरिपंत फडके, मोरोबा फडणवीस, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर, सखारामबापू बोकील, त्रिंबकराव पेठे, भगवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे, रास्ते, फलटणचे निंबाळकर आणि बाबुजी नाईक, ही प्रमुख मंडळी होती. राघोबास पदच्युत करून नारायणरावांची गरोदर पत्नी गंगाबाईस होणाऱ्या मुलास पेशवा करून त्याच्या नावाने कारभार करावा, असे ठरविण्यात आले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.
नाना अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध होती. त्यांची लेखणी हीच त्यांची तलवार होती.
सवाई माधवरावांच्या जन्मापासूनच पेशवाईचा कारभार ते सांभाळत होते. त्यांचे स्वतःचे हेरखाते होते. लढाई नाही पण राजकारण व त्यातील शह काटशह यात ते तरबेज होते. महादजी शिंदे आणि त्यांचा सलोखा होता. नानांनी व महादजींनी मराठी सत्तेवरील इंग्रजी आक्रमणाची लाट 25 वर्षे थोपवून धरली, यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते. काही कठोर निर्णयामुळे त्यांनी शत्रूही निर्माण केले होते. इंग्रज, टिपू आणि निजाम यांच्याबरोबर त्यांनी मुत्सेद्देगिरीने राजकारण केले.
महादजी शिंदे यांच्या निधनानंतर मात्र त्यांना एकाकीपण आले. रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव पेशवेपदी आल्यावर नानांचे आणि त्यांचे जमले नाही. बाजीरावाने त्यांना नगरच्या किल्ल्यात बंदिवान केले. नानांना नवकोट नारायण असेही म्हणत. बऱ्याचशा गोष्टी पैशाच्या जोरावर करीत.