पुणे – पावसाळ्यात चेंबर सफाईसाठी महापालिकेतील तब्बल 25 ते 30 कोटी रुपयांचा खर्च तीन महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, ही चेंबर सफाई झालेलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी थेट महापालिका आयुक्तांच्या समोरच उघडकीस आला आहे. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नसल्याचेही समोर आले आहे.
मात्र, या प्रकारामुळे मनुष्यबळाच्या नावाखाली एकच कामगार अनेक ठिकाणी कागदावर दाखवून पालिकेची तिजोरी साफ करण्यात येत असल्याचेही समोर आले असून पुणेकरांना मात्र, पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात कर्वेनगर, धायरी, सिंहगड रस्ता, वारजे, कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, बाधवन, खराडी, विमाननगर, कात्रज-कोंढवा रस्ता, या भागास सर्वाधिक बसत आहे.
आयुक्तच झाले हतबल
कर्वेनगर परिसरात शुक्रवारी दुपारी मोठा पाऊस झाल्याने कर्वेनगरमधील समर्थ पथ तसेच प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या परिसरातील सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या घटनेनंतरही महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी थेट पालकमंत्र्यांना तक्रार केली. त्यानंतर थेट आयुक्तच अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आले. मात्र, यावेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारीच नव्हते.
कर्मचारी आले तर साहित्य नव्हते. तर पाणी जाण्यासाठी चेंबर उघडली असता ती गाळाने भरलेली असल्याने त्यातून पाणीच जात नव्हते. तसेच या कामासाठी मनुष्यबळच नव्हते. विशेष म्हणजे, क्षेत्रीय कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनासाठीचे कर्मचारी इतरत्र असल्याने गणेश विसर्जनाच्या कामातील कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी बोलविले. त्यानंतरही दुपारी साडेतीन वाजता झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा रात्री साडेतीन वाजता झाला होता.
जबाबदारी झटकण्याचा उद्योग
नाले तसेच पावसाळी वाहिन्यांच्या सफाईचे काम ड्रेनेजच्या मुख्य खात्याकडून केले जाते. त्यासाठीचा निविदा हाच विभाग काढतो. मात्र, प्रत्यक्षात शहरात पाणी साचल्यानंतर आयत्या वेळी कर्मचारी देण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे. त्याच वेळी निधी नसल्याने क्षेत्रीय कार्यालयाने या कामासाठी कर्मचारीच नेमलेले नाहीत.
तर आपत्ती व्यवस्थापन विभागानेही प्रत्येकी चार ते पाच कर्मचारी दिले असून ड्रेनेज विभाग शहरात पाणी साचलेल्या ठिकाणी कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांची पळवा पळवी करत असल्याने पाणी साचण्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही.