नवी दिल्ली ; महाराष्ट्रानंतर आता राजस्थानमध्ये सत्ता पालट होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण राजस्थानमध्ये काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली असल्याने सरकार संकटात आले आहे. ७१ वर्षीय अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेअशोक गेहलोत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी नेतृत्वाची इच्छा आहे. यावरुनच राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी, “आमदार संतप्त असून, आपल्या हातात काहीच नाही” असे स्पष्टपणे सांगितले आहे. वेणुगोपाल यांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत याविषयीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याविषयी बोलताना,“मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली नाही, किंवा त्यांनी मला फोन केला नाही. लवकरच तोडगा काढला जाईल,” असे वेणुगोपाल म्हणाले आहेत.
आमदारांनी अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदी राहावेत किंवा त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीला हे पद देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यांनी सरकार कोसळलं तरी आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचे विधानसभा अध्यक्षांना सांगितले आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांनी २०२० मध्ये गेहलोत यांच्याविरोधात पुकारलेल्या बंडाचाही उल्लेख केला आहे. सरकारला पाठिंबा देईल अशी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.