जयपूर -भाजपने सत्ता काबीज केलेल्या राजस्थानमधील करणपूर या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अद्याप बाकी आहे. राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या त्या लढतीचा निकाल ८ जानेवारीला जाहीर होणार आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल महिनाभरापूर्वीच जाहीर झाला. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने सरकारही स्थापन केले. मात्र, कॉंग्रेसचे उमेदवार गुरमितसिंह कुन्नर यांच्या निधनामुळे करणपूरमधील निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. आ
ता त्या मतदारसंघात शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. तिथे ८१.३८ टक्के मतदान झाले. भाजपने आधीच सत्ता मिळवली असल्याने एरव्ही एका जागेसाठीच्या निवडणुकीला फारसे महत्व आले नसते.
मात्र, भाजपने दिलेल्या उमेदवारामुळे ती निवडणूक त्या पक्षाप्रमाणेच सत्ता गमवावी लागलेल्या कॉंग्रेसच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने सुरेंद्रपाल सिंह यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवार बनवल्यानंतर राजस्थानात मंत्रिमंडळ रचनेची घडामोड घडली. त्यानुसार, सिंह यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली.
त्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला. उमेदवाराला मंत्री बनवणे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. मात्र, आता करणपूरमधील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. कॉंग्रेसने निधनाआधी आमदार असणाऱ्या कुन्नर यांचे पुत्र रूपिंदरसिंह यांना उमेदवारी दिली. आता तिथे कुणाचे पारडे जड ठरणार याविषयी उत्सुकता आहे.