नीरा -करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासन गर्दीची ठिकाणे टाळा म्हणून सांगत आहे. त्याचबरोबर दैनंदिन कामे करताना सामाजिक अंतर राखण्याचे व तोंडाला मास्क बांधण्याचे सांगत आहे, असे असले तरी लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नीरा बाजारपेठेत लोक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. ही गर्दी पांगवताना पोलिसांची मात्र मोठी दमछाक होताना दिसतेय.
सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये नीरेसारख्या ग्रामीण शहरामध्ये बहुतांश दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत सुरु होत आहेत; मात्र बाजारपेठेत गर्दी होत आहे. तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या आदेशानुसार मुख्यबाजार पेठेतील रस्ता वाहनांसाठी बंद केला आहे.
तरी अनेक लोक आडमार्गाने वाहने आणून बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना आता रस्त्यावर उतरून काम करावे लागत आहे. अनेकवेळा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने 24 तास काम करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला स्थानिक युवक सरसावले आहेत.
अनेकजण फिरून यायचे म्हणून बाजार पेठेत दुचाकी घेवून येतायत. कपडे आणि सोने खरेदीसाठीच लोक येताना दिसतायत कारण याच दुकानातून गर्दी दिसते आहे. सकाळपासुनच पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, हवालदार सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, जी. डी. भोसले, कॉन्स्टेबल निलेश जाधव, पोलीस मित्र यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तरी गर्दी कमी झाली नाही.
अन्यथा करोना घराघरात दिसेल
पुरंदर तालुक्यात आता करोनाचे रुग्ण सापडले आहेत. अनेक गावात मुंबईसारख्या शहरातून लोक आले आहेत. त्यांच्यातील अनेकजण प्रशासनाचा डोळा चुकवून बाजार पेठेत खरेदीसाठी येत आहेत. अशा वेळी लोकांनी घराबाहेर फिरताना तोंडाला मास्क बांधले पाहिजे. त्याचबरोबर आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडायला हवे. तसेच प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर राखायलाच हवे. अन्यथा गावाकडे आलेला करोना घराघरात दिसेल.