प्रशांत जाधव
सातारा – पोलीस दल हे शिस्तीचे असून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक दंडक, नियम, शिष्टाचार आदींचे पालन करावे लागते; परंतु वरिष्ठांकडून शिस्तपालनाचा अतिरेक झाला तर त्याचा परिणाम “फील्ड’वर काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर होतो. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून, पाठीवर थाप टाकून काम करून घेण्याऐवजी किरकोळ चुका काढून अव्वाच्या सव्वा दंड आकारणे, मानसिकता बिघडवणे या प्रकाराला वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्या तुघलकी कारभाराची भीती वाटत आहे.
करोना काळातील सततच्या कामामुळे आधीच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. त्यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एखाद्या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या वागण्यात बदल करून कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा चोवीस चोवीस तास ड्युटी, कुटुंबापासून सतत लांब रहावे लागते. कर्तव्य बजावताना द्यावी लागणारी सत्वपरीक्षा, वेळी अवेळी बंदोबस्तासाठी होणारी नेमणूक, यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची मन:स्थिती काय असेल, याचा अंदाज न केलेला बरा. त्यातून उद्भवणारे आजार, कौटुंबिक वाद, मुलांचे शिक्षण, नोकऱ्यांचे प्रश्न, सरकारकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, असे अनेक प्रश्न पोलिसांना भेडसावत आहेत. अशातच एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अकारण किंवा किरकोळ कारणांवरून त्रास दिला जात असेल तर कर्मचाऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करोना काळात गेले सात महिने अहोरात्र कर्तव्य बजावून शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचत चाललेल्या पोलिसांना आता खरे तर समाजाकडून, वरिष्ठांकडून कौतुकाची आणि आधाराची गरज आहे; परंतु होम डीवायएसपींचा खाक्या काही औरच आहे. पायात खाकी मोजे घातले नाहीत, थंडीच्या दिवसात स्वेटरच घातला आहे, पायातील बूट सरकारी नाही, कपड्यांना इस्त्री नाही, वरिष्ठांसमोरून जाताना डोक्यावर टोपी घातली नाही, महिला कर्मचाऱ्याने साडीच का नेसली, अशा किरकोळ कारणांसाठी कर्मचाऱ्यांना हजारो रुपये दंडाच्या शिक्षा केल्या जात आहेत. पोलिसांना शिस्त हवी, यात शंका नाही; परंतु नेमक्या कोणत्या अडचणींमुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्या, ते समजून घेण्याचीही गरज आहे.
कामाचा अतिरिक्त ताण, वरिष्ठांकडून होणारा अकारण त्रास यामुळे मन:स्वास्थ्य बिघडलेल्या पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना देशात व महाराष्ट्रात घडल्या आहेत. वरिष्ठांची अरेरावी, पक्षपातीपणा, बदल्या, नियुक्त्यांसाठी वशिलेबाजी, वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या “सेवा’ पुरविण्याचा शिरस्ता, या संदर्भात आजवर बऱ्याच वेळा चर्चा झाली आहे. त्याबद्दल माध्यमांमधून बरेच काही लिहिले गेले आहे; पण त्याचा गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही. कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी यात तातडीने लक्ष घालून आपल्याच कर्मचाऱ्यांवर अकारण होत असलेला अन्याय थांबवला पाहिजे. होम डीवायएसपींच्या शिस्तप्रिय स्वभावाचे माध्यमांनी अनेकदा कौतुक केले आहे; परंतु एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्यावरही भाष्य करणे आवश्यक आहे.
पोलिसांना घरभाडे सुरू करा
पोलिसांच्या निवाऱ्यासाठी सरकारने वसाहती केल्या आहेत; परंतु या वसाहतींची अवस्था पाहिली तर तिथे पोलिसांची कुटुंबे कशी राहतात, असा प्रश्न पडतो. मोडकळीस आलेल्या इमारती, खिडक्यांची तुटलेली तावदाने, तुंबलेली गटारे, स्वच्छतागृहांची दुरवस्था असल्याने अनेक पोलीस कर्मचारी भाड्याच्या घरांमध्ये अथवा स्वत:च्या घरांमध्ये राहतात. त्यात बिघडले कुठे? परंतु सरकारी वसाहतींमधील खोल्या रिकाम्या असल्याचे कारण पुढे करून पोलिसांना मिळणारा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे; परंतु त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी घरभाडे भत्ता सुरू करण्याची गरज आहे.