दोन घरेच पेटवली; अनेक ठिकाणी लाठीमार, अश्रुधुराची नळकांडी फोडली
नवी दिल्ली : नवी दिल्लीत सोमवारी उफाळलेल्या हिंसाचरात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एका मुलाला वाचवताना हा कर्मचारी जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना जगप्रवेशचंद्र रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान हिंसाचार उफाळलेल्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे केली आहे.
दिल्लीतील शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणाला गालबोट लागल्याची अत्यंत दुर्देवी बातमी हाती येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुनर्प्रस्थापित करणुयासाठी मी गृहमंत्री आणि राज्यपालांना गांभीर्याने विनंती करत आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी देऊ नये असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हवालदार महंमद सलीम हे एका मुलाला जमावापासून वाचवताना जखमी झाले. त्याची बोटे आणि मनगट प्रॅक्चर झाले होते. त्यांना सीलाम येथील जगप्रवेशचंद्र रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी दुपारी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी उत्तर पूर्व दिल्लीतील नागरिकांनी शांतता पाळावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच समाजकंटकांवर आणि हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यात म्हटले आहे.
सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधातील निदर्शक आणि या कायद्याचे समर्थक यांच्यातील चकमक दुसऱ्या दिवशी सुरूच राहिल्या. यात दोन घरे पेटवून देण्यात आली. दोन्ही गटांनी परस्परांवर तुफानी दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही.
शहरातील जाफराबाद भागात दोन्ही बाजूचे जमाव रविावारी आमने सामने आल्याने या संघर्षाला सुरवात झाली. मोठ्या संख्येने जमलेल्या निदर्शकांनी रस्ता रोखला. अशीच निदर्शने राजधानीत अन्य ठिकाणीही सुरू झाली. यात एका वीस वर्षाच्या युवकावर जमावाने हल्ला चढवला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली.
उत्तर पूर्व दिल्लीत निदर्शकांनी दोन घरे पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला. जाफराबाद आणि मौजपूर येथून अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळावर पाठवण्यात आले. मात्र सोमवारी पुन्हा या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. चांदबाग भागातही हिंसाचर उफाळल्याचे वृत्त हाती येत आहे.
त्या भागात आग लागल्याचा दूरध्वनी आल्याने पाठवण्यात आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबची नासधूस करण्यात आली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर जाफराबाद मौजपूर-बाबरपूर ही दोन मेट्रोस्थानके बंद करण्यात आली. या स्थानकावर रेल्वे थांबणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले.
हिंसाचार सुरू झाला तरी जाफराबाद मेट्रोस्टेशनबाहेर महिलांची निदर्शने सुरूच राहिली. सुमारे 500 महिला तेथे ठाण मांडून आहेत. तेथे तीन वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी मौजपूर येथे हिंसाचार घडवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. भाजपा नेते कफील मिश्रा यांनी निदर्शकांना हटवण्यासाठी मोर्चा काढला. त्यानंतर हिंसाचारास सुरवात झाली.