नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी पंतप्रधान मोदी हे विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या वर्षीच्या कोरोना संकटानंतर पहिला विदेश दौरा हा शेजारील मित्र देश बांगलादेशचा होतोय. या देशासोबत भारताचे दृढ संबंध आहेत. यामुळे या दौऱ्याबाबत आनंदी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड होईल. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना 19 बंदुकांची सलामी गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचे निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकसोबत सलामी मंचावर जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील.
Delhi: Prime Minister Narendra Modi embarks on a two-day visit to Bangladesh, his first visit to a foreign country since the COVID19 outbreak
He will attend an event at the National Martyr's Memorial and the National Day program today. pic.twitter.com/SRLgFGleBL
— ANI (@ANI) March 26, 2021
भारताचे बांग्लादेशसोबत असणारे संबंध मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग केली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी 2021 मध्ये बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारत भेटीवर आले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले होते.