एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे राष्ट्रीय अभ्यास दौरा
पुणे – राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणे आवश्यक आहे. लोकांच्या मागण्या आणि त्यांच्या आकांक्षा ऐका. शासकीय योजनांचा पाठपुरवठा करून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. दिवसातून एकदा तरी सोशल मीडियाचा वापर करा. कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून त्याचे नियोजन करा. तसेच राजकारणात अंतिम लक्ष्य लोकांसाठी काम करणे आहे हे सदैव लक्षात ठेवा, असा सल्ला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या 16 व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा नुकताच दिल्ली येथील राष्ट्रीय अभ्यास दौरा पार पडला. या दौऱ्याचे नेतृत्व मिटसॉगचे प्राध्यापक परिमल सुधाकर आणि संकल्प संघई यांनी केले होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार प्रा. डी. पी. आपटे हे ही उपस्थित होते. यामध्ये 15 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या अभ्यास दौऱ्यात देशपातळीवरील राजकारणाची आणि सरकारची इत्यंभूत माहिती मिळविणे, संसदेचा कारभार, राजकीय पक्षांच्या कार्यालयाची भेट, राष्ट्रीय नेत्याशी संवाद साधणे या अभ्यास दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोग, नीती आयोग, विविध मंत्रालये येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अनेक खासदारांची भेट घेत त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले.
विद्यार्थ्यांनी बीकेयूचे मुख्य प्रवक्ता राकेश टिकैत, कर्नाटकचे राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, आयएनसीचे लोकसभा खासदार डॉ. मोहम्मद जावेद, कॉंग्रेसचे भक्तचरण दास, डीएमकेचे लोकसभा सदस्य सिनथिल कुमार, लोकसभा सदस्य राजेंद्र अग्रवाल, खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून राजकारणात आल्यावर जनसेवा कशी करावी आणि समाजन्नोतीसाठी कसे कार्य करावे यावर विशेष प्रकाश टाकला.