मुंबई – आमदार, खासदार तोडून सत्ता स्थापन केली. हे लाचार मिंधे सत्ता आणि खोक्यासाठी तिकडे गेले. मात्र, कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहे. उद्या आपल्या पक्षाचा वर्धापन दिन आहे, तर परवा जागतिक गद्दार दिन आहे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. मुंबईमधील आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारावरून थेट पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर निशाणा साधला.
मणिपूर येथे गेल्या एक महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यावरूनच उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला खडे बोल सुनावले. सत्तेची मस्ती आम्ही उतरवू शकतो, हा तुमचा सत्तेचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही असं ठाकरे यावेळी म्हणाले. एवढीच तुम्हाला सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ईडी, सीबीआय अधिकारी पाठवा, जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का ते बघा. तिकडे लोक त्यांना जाळून टाकतील. तिकडे अमित शाहांना देखील कोणी जुमानत नाहीये असं देखील ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
अमित शहांनी मणिपूरमध्ये जाऊन काय केले? पंतप्रधान मोदी अमेरिकेला चालले आहेत पण मणिपूरला जायला तयार नाहीत अशी टोलेबाजी यावेळी ठाकरेंनी केली. तसेच विश्वगुरू? अमेरिकेत विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार, माझ्या देशातील एक राज्य पेटलं आहे. अरे तुम्ही रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवलं ही भाकड कथा सांगितली. ही भाकड कथा खरी करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा असं आव्हान देखील यावेळी ठाकरेंनी मोदी शहांना दिल.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमची एकजूट ही विरोधकांची नाही तर देशप्रेमींची आहे. म्हणून मी पटणा येथे होणाऱ्या बैठकीला जाणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला कुणी अदानीवर प्रश्न विचारला तर तुमची बोबडी ओळते, तुम्ही राहुल गांधींना घराबाहेर काढता, आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार का ? असा टोला अमित शहा यांना लगावला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून उटसूट लुटालूट सुरू आहे. सरकारकडून मुंबईची लूट सुरू आहे. जाहिरातीमध्ये बापच बदलला होता, दुसऱ्या दिवशी सर्वाचे फोटो टाकले असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
ना घर का ना घाट का अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था झाली आहे. कर्नाटकात बजरंगबलीची घोषणा देऊनही खुर्चीला आग लागली कारण जनतेची तुमचे खरे रुप माहिती झाले आहे. तुम्ही भांडणे लावून एकदा निवडणूक जिंकू शकता मात्र नेहमी नाही.