मुंबई :- महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या २० जून रोजी या घटनेेस एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा.
शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे जयंत पाटील यांनी सूचित केले आहे.