नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा द्रुतगती मार्गाची आज पायाभरणी केली. हा सहा पदरी 594 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी 36,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.
मीरत मधील बीजौली गावाजवळ सुरु होत असलेला हा द्रुतगती महामार्ग, प्रयागराज मधील जुनापुर दांडू या गावापर्यंत पोहोचेल. हा मार्ग, मीरत, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभाल, बुदाऊन, शहाजहानपूर, हरडोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराज असा मार्गक्रमण करेल.
या द्रुतगती महामार्गाचे काम संपल्यानंतर, उत्तर प्रदेशातील पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा हा सर्वात अधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग असेल. हवाई दलाच्या विमानांचे आपत्कालीन लॅन्डिंग करण्यासाठी मदत व्हावी म्हणून या द्रुतगती महामार्गावर, शहाजहानपूरमध्ये 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी देखील उभारली जाणार आहे. या द्रुतगती महामार्गाच्या लगत औद्योगिक मार्गिका उभारण्याचा देखील प्रस्ताव आहे.
हा महामार्ग, औद्योगिक विकास, व्यापार,कृषी, पर्यटन, इत्यादी विविध क्षेत्रांना देखील प्रोत्साहन देईल. हा महामार्ग या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना देणारा ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.
ज्याप्रमाणे गंगा सर्व सुख देते, सर्व दुःख हरण करते. त्याचप्रमाणे गंगा द्रुतगती मार्गही उत्तरप्रदेशाच्या प्रगतीची नवी दारे उघडेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेशची एकत्रित प्रगती होते तेव्हा देशाची प्रगती होते, त्यामुळे दुहेरी इंजिन सरकारचे लक्ष उत्तर प्रदेशच्या विकासावर आहे.असे पंतप्रधान म्हणाले.
ब्रिटिश राजवटीला आव्हान देणाऱ्या काकोरी घटनेतील क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान आणि रोशन सिंह शाहजहानपूरच्या या तीन सुपुत्रांना 19 डिसेंबरला फाशी देण्यात आले होते. या हुतात्म्यांना यावेळी पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.