मुंबई – मुंबई -पुणे महामार्गापासून देशात रस्ते उभारण्याचे काम वेगात चालत आहे. रस्ते उभारणी यासारख्या पायाभूत क्षेत्रात केलेली गुंतवणूक निश्चित फायदेशीर ठरते असे रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी गुंतवणूकदारांना सांगितले.
पायाभूत सुविधावरील गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, सध्या आम्ही 90% जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतरच रस्ते उभारण्याचे काम हाती घेतो. त्यामुळे रस्ते उभारणी क्षेत्रात पूर्वीसारखे अडथळे येत नाहीत.
पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पासाठी गुंतवणूक मिळत नाही हा गैरसमज चुकीचा आहे असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात मुंबई- पुणे एक्सप्रेस वे उभारताना आम्ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. सुरुवातीला आम्ही शेअर बाजारातून 500 कोटी रुपयांची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आम्हाला 1,160 कोटी रुपये मिळाले.
त्यानंतर 750 कोटी रुपये उभारण्यासाठी प्रयत्न केला असता 1,100 कोटी रुपये मिळाले.
यावेळी आम्हाला ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी शाबासकी दिली होती. आमच्यापेक्षा तुम्ही अधिक सक्षमतेने पायाभूत सुविधासाठी निधी उभारणी करीत आहात असे टाटा म्हणाले होते.
आम्ही भारतातील पहिला मुंबई – पुणे एक्सप्रेस वे केवळ 1,600 कोटी रुपयात उभा केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारला या प्रकल्पातून पहिल्यांदा 3,000 कोटी आणि दुसऱ्या वेळी 8,000 कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प किती फायदेशीर ठरतात हे दिसून येते.
रिलायन्सची निविदा नाकारली होती
25 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई- पुणे एक्सप्रेसवे साठी धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे 3,600 कोटी रुपयाची निवीदा आम्ही नाकारली होती. त्यावेळी रिलायन्स उद्योग समूह बरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि इतर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आम्ही त्यापेक्षा कमी किमतीत हा प्रकल्प उभारू असे त्या वेळी सांगितले होते. आम्ही हा प्रकल्प केवळ 1,600 कोटी रुपयात पुर्ण केला होता असे गडकरी यांनी सांगितले.