नवी दिल्ली: देशभरात सामूहिक हत्यांच्या (मॉब लीचिंग) वाढत्या घटनांच्या विरोधात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे मॉब लीचिंगच्या निषेधात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ४९ व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात देशभरात मॉब लीचिंग वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांनी हस्ताक्षर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात देशात शांती व सुरक्षित वातावरणबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे सामूहिक मारहाणीत निरापराध लोकांचा बळी गेले असून यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे, असेही नमूद केले आहे. या पत्रात पुढे लिहिले आहे की, ‘ गेल्या काही दिवसांमध्ये मॉब लीचिंगमुळे देशभरात दाहक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मॉब लीचिंगमुळे देशातील लोकशाही सुद्धा हुकूमशाहीकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे प्रिय पंतप्रधानांनी याबाबत कारवाई केली आहे का? असा प्रश्न ही या पत्रात विचारला आहे.