पुणे – केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्ह्यातील शिरूर आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश जलशक्ती अभियानात आहे. या अनुषंगाने या अभियानाची सद्यस्थिती व सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, कृषी, महसूल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना, चेक डॅम, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन, पारंपरिक पाणीयोजना, तळी आदी संरचनांचे नूतनीकरण तसेच विहिरी आणि विंधनविहिरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला.