समभागधारकांनी टाकला बीसीसीआयवर दबाव
मुंबई – आयपीएल स्पर्धा सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे जरी बीसीसीआयने जाहीर केले असले तरीही त्यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळविण्यासाठी समभागधारकावर दबाव टाकत आहेत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयचे समभागधारक दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचेही समभागधारक आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ आयपीएलपूर्वी या मालिकेत सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. करोनामुळे मुळातच जवळपास 4 महिने क्रिकेट ठप्प होते. याचा फटका जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयलाही बसलेला आहे. त्यामुळे निदान यावेळी तरी समभागधारकांच्या आग्रहाला नकार देणे बीसीसीआयला परवडणारे नाही.
आयपीएल स्पर्धा 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. मात्र, या महिन्याच्या अखेरीस अहमदाबादमध्ये संघाचे सरावसत्र आयोजित करून दक्षिण आफ्रिका संघाला भारतात आमंत्रित करायचे. सरावसत्र सुरू असेल तोपर्यंत त्यांचा संघ 14 दिवस विलगीकरणात राहील व त्यानंतर या दोन संघात किमान 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात यावी, असा दबाव बीसीसीआयवर टाकला जात आहे.
मार्चमध्ये याच दोन संघांत मालिका होणार होती. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धर्मशाला येथील पहिला सामना पावसाने वाया गेला व त्यानंतर करोनाचा धोका वाढल्याने उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्यात आले होते. या मालिकेसाठी ज्या प्रायोजकांनी व समभागधारकांनी करार केला होता, त्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे येत्या ऑगस्टमध्ये याच दोन संघांत मालिका खेळविण्याचा आग्रह होत आहे.
ऑस्ट्रेलिया मंडळाचा बीसीसीआयला फटका
आयपीएल स्पर्धा पार पडल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी भारतीय संघ तेथे दाखल होणार असून त्यानंतर खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना दोन आठवड्यांसाठी विलगीकरणात राहावेच लागेल, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले असून हा बीसीसीआयला धक्का समजला जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी या विलगीकरणाच्या कालावधीत घट व्हावी, अशी मागणी केली होती, ती ऑस्ट्रेलिया मंडळाने फेटाळली आहे.