माजी हॉकीपटू भास्करन यांचा सल्ला
नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचे असेल तर तयार केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी अत्यंत योग्य पद्धतीने केली पाहिजे, असा सल्ला माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक व्ही. भास्करन यांनी दिला आहे.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. त्यात आपण 8 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला होता. मात्र, मॉस्को येथे झालेल्या 1980 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत आपल्याला एकदाही पदक जिंकता आलेले नाही. पुरुष हॉकी संघापेक्षा जास्त सरस कामगिरी गेल्या दोन वर्षांत महिला संघाने केली आहे.
यंदा ते टोकियोला पात्रही ठरले. मात्र, करोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे गेल्यामुळे सर्वांचीच निराशा झाली. अर्थात हा जबरदस्तीने मिळालेला वेळ खेळाडूंसाठी लाभदायकच ठरेल. महिला संघाच्या बरोबरीने आता पुरुष संघानेही या स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धी संघाचे कमकुवत दुवे अभ्यासून आतापासूनच योजना तयार केल्या पाहिजेत. तसेच या योजनांची अंमलबजावणीही अत्यंत योग्य पद्धतीने झाली पाहिजे तरच टोकियोत पदक जिंकता येईल, असेही भास्करन यांनी सांगितले.
भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ जर परत आणायचा असेल तर संघातील प्रत्येक खेळाडूने क्षमतेपेक्षाही जास्त सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे. केवळ सरावाने ही तयारी होणार नाही तर खेळाडूंनी आपल्या यापूर्वी झालेल्या सामन्यांतील खेळाचे निरीक्षण करावे. भारताचा पुरुष व महिला हॉकी संघ चांगला बांधला गेला आहे. संघात अनुभवी व नवोदित असा योग्य समतोल आहे.
ऑलिम्पिकपूर्वी प्रो-हॉकी लीग स्पर्धा आहे. त्यात अर्जेन्टिना, ब्रिटन, स्पेन व जर्मनी यांच्याशी सामने होतील. त्यानंतर न्यूझीलंडशी मायदेशात सामने होणार आहेत. त्यात सरस कामगिरी करून ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याची सुवर्णसंधी आहे. योजना तयार करा व त्याची अचूक अंमलबजावणी करा यश निश्चितच मिळेल, असा विश्वासही भास्करन यांनी व्यक्त केला.