कोलकाता: भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या शुक्रवारपासून होणाऱ्या प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी शहरात गुलाबी लाट निर्माण झाली आहे. असे वाटते की पिंकसिटी आता जयपूर नसून कोलकाताच आहे.
संपूर्ण शहर गुलाबी रंगात परावर्तित झाले आहे. सगळीकडे सामन्याचा उत्साह दिसू लागला आहे. बंगाल क्रिकेट संघटनादेखील या सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज असून क्रिकेट चाहत्यांसाठी वेगवेगळ्या सुविधादेखील देण्यात येणार आहेत. सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
क्रीडाक्षेत्रातील नामांकित खेळाडूंचाही या सामन्यादरम्यान सत्कार केला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना या सामन्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.