शरद पवार यांची पंतप्रधानांशी चर्चा
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप करावा, अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रामध्ये केली आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या दोन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची माहिती आपण गोळा केली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील तपशील आणि अधिक माहितीही आपण एकत्र करत आहोत.
ही माहितीही पंतप्रधानांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीही मिळालेली नाही. सध्याच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर सध्याचे पिककर्जही माफ करण्यात यावे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी होण्याची शक्यता असतानाच पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. सोमवारी पवारांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेतली होती. मात्र त्यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासंदर्भात काहीही चर्चा झाली नाही, असे पवार म्हणाले होते.