हिंजवडी, (वार्ताहर) – माणच्या मानदेवी परिसरात तसेच मुख्य चौकात झालेली अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे माणवासीय हैराण आहेत. माणवासीयांच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चौकातील चिकन, मासे, मटणाची विक्री करणारी दुकाने तातडीने हटवा, अशी एकमुखी मागणी माण ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित दुकानदारांना दुकाने स्थलांतरित करण्यासाठी नोटीस बजावल्या असूनही दुकाने अन्य ठिकाणी हलविली जात नाहीत. पीएमआरडीए प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
माणदेवी मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच माण चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तरुणाई आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीने यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी येथील तरुणांनी केली आहे. त्यानुसार माण ग्रामपंचायतीने पीएमआरडीए, पोलीस प्रशासन तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनही या दोन्ही विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याने पीएमआरडीए प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माणच्या मुख्य चौकात चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या चौकात तासन्तास वाहतुकीची कोंडी होऊन रोजच चक्का जाम होत आहे. पथारीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. त्यामुळे आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांना देखील या वाहतूक कोंडीचा मुकाबला करावा लागत आहे.
रहदारीच्या या चौकात झालेल्या अतिक्रमणामुळे माण देवी चौकाचा श्वास गुदमरलेला असून हे अतिक्रमण केव्हा हटविणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या चौकातच प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णालयात ये-जा करणार्यांची दमछाक होते. तर अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडते. त्याचप्रमाणे या चौकालगत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याने चिमुकल्या मुलांना गर्दीतून वाट काढणे जिकरीचे बनत आहे.
पालक व मुलांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मागील झालेल्या ग्रामसभेत अनेक तरुणांनी चौकातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार ग्रामपंचायतीने शासन दरबारी पाठपुरावा देखील केला. मात्र ढिम्म प्रशासनाकडून अद्याप काहीच कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
माणदेवी मंदिराचे परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी चौकात झालेली अतिक्रमण व मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने हटविण्यात यावीत असा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आम्ही संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असून, ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संबंधित दुकानदारांना नोटीस देखील बजवल्या आहेत.- अर्चना आढाव, सरपंच माण.
मंदिर परिसरात चिकन, मटण, मासे यांच्या विक्रीमुळे मंदिर परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मांसमच्छीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे भाविक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही प्रशासन कार्यवाही करत नसेल तर गावातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. – एक भाविक, तरुण.