पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य पाईपलाईनमध्ये गळती होत आहे. या गळतीचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. या कामासाठी गुरूवार (दि.13) रोजी शहरातील काही भागाचा सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (दि. 14) रोजी सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होता. महापालिका रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून अशुध्द जलउपसा करते. हे पाणी निगडी, प्राधिकरणातील जल शुध्दीकरण केंद्रात शुध्द करून शहराला वितरित करते. मात्र, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य पाइपलाइनमध्ये गळती होत आहे.
या गळतीचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील थेरगाव ग्रॅव्हीटी व रावेत किवळे ग्रॅव्हीटीवरील सर्व भाग थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, पिंपळे निलख, विशालनगर, पुनावळे, ताथवडे, रावेत से. 29 च्या टाकीवरील भागासह, किवळे, मामुर्डी, विकासनगर, जिल्हा रुग्णालय व उरो रुग्णालय सांगवी, बालेवाडी स्टेडियम, निगडी प्राधिकरण, से. क्र. 21 ते 28, आकुर्डी, खंडोबा माळ, मोहननगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, कृष्णानगर, इंद्रायणीनगर, पांजरपोळ, सेक्टर 12, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, पवार वस्ती, रुपीनगर, चिखली या भागांतील गुरूवारी सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तर दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.