पिंपरी – पुनावळे कचरा डेपोचा प्रश्न सुटत नसल्याने चिंताग्रस्त असलेल्या पुनावळे, हिंजवडी, मारुंजी ग्रामस्थांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत योग्य मार्ग सुचविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. त्यावर ठाकरे यांनी तीन दिवसांचा वेळ मागितला असून, यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
हिंजवडी माहिती तंत्रज्ञान (आयटी) वसाहतीमुळे पुनावळे परीसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून लोकवस्ती वाढली आहे. एकट्या पुनावळेत 1 लाखाहून अधिक रहिवासी राहत आहेत. या परिसराल नैसर्गिक वारसा लाभल्याने राहण्यासाठी पसंती मिळत आहे. पुनावळे कचरा डेपोमुळे त्याला बाधा पोहोचणार असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कचरा डेपो उच्चभ्रु वसाहतींपासून अगदीच 200 ते 400 मीटर अंतरावर आहे. ज्यावेळी कचरा डेपो प्रस्तावित केला, त्यावेळी येथे एवढ्या प्रमाणात नागरीकरण नव्हते. परंतु, पंधरा वर्षात येथे गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आल्या. नोकरीसाठी देश, राज्य आणि परराज्यातील नागरिक सोसायट्यांमध्ये राहत आहेत. हे जनजीवन कचरा डेपोमुळे विस्कळीत होणार आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांना निवेदन देताना पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, उपशहराध्यक्ष राजु सावळे, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुंखे, मारुंजी शहराध्यक्ष संतोष कवडे आदी उपस्थित होते.
तीन दिवसांत तोडगा काढू – राज ठाकरे
2008 रोजी प्रस्तावित कचरा डेपो सुरु करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने विलंब का केला? आता कचरा डेपोसाठी अडसर ठरणारी 22 हेक्टर मधील शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे. तसेच, जवळील जलसिंचनातून नागरिकांना दुषित पाण्याचा त्रास सोसावा लागणार आहे. त्यातच हा डेपो पिंपरी-चिंचवडच्या पश्चिमेला आहे. नैसर्गिक वारे नेहमी पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहते. कचरा डेपोतील दुर्गंधी पुनावळे, वाकड, ताथवडे, हिंजवडी आयटी पार्क, मारुंजी, मुंबई-पुणे माहामार्ग येथील रहिवाशांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे कचरा डेपो रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.