पुणे – झटपट घटस्फोट मिळण्यासाठी दावे वाढत आहेत, तर दुुसरीकडे “घटस्फोट नको’ म्हणून पुन्हा नांदायला येण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मागील अडीच वर्षांत परस्पर संमतीच्या घटस्फोटापेक्षा पुन्हा एकत्र येण्यासाठी केलेल्या दाव्यांचे प्रमाण अधिक आहे.
एकटेपणा, पती-पत्नीत वाद सुरू असताना घरच्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे जोडीदाराचे महत्त्व कळत आहे. त्यामुळे पुन्हा नांदण्यास येण्यासाठी अर्ज करण्यात येत आहेत. मागील दहा महिन्यांत येथील कौटुंबिक न्यायालयात 694 दावे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी 625 निकाली निघाले. तर, तब्बल 832 दावे पुन्हा नांदण्यास येण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी 765 दावे निकाली निघाले आहेत. त्यामुळे विकोपाला गेलेला वाद समुपदेश आणि सुसंवादानंतर सुटत असल्याचे आशादायी चित्र कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
पती-पत्नीच्या भांडणाचा विपरित परिणाम मुलांवर होतो. त्यामुळे विभक्त होताना अनेक दाम्पत्य मुलांच्या मनाचा विचार करून, वाद न घालता परस्पर संमतीनेच वेगळे होतात. घटस्फोटाच्या एकूण अर्जांपैकी 50 टक्क्यांहून अधिक अर्ज परस्पर संमतीचे असतात. मात्र, दुसरीकडे मुलांच्या भविष्याचा विचार करून पुन्हा एकत्र येणाऱ्या पालकांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येणाऱ्या पालकांची संख्या वाढली आहे.
“अलिकडच्या काळात घटस्फोटांच्या दाव्याचे प्रमाण वाढले आहे. समाज माध्यमांचा अतिवापर, संशयी वृत्ती, अहंकार, संवादाचा अभाव आणि दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र या कारणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जोडप्यांनी एकमेकांना समजून घेणे, मुलांचे भवितव्य लक्षात घेणे, चुका झाल्या तरी त्या विसरून बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घटस्फोटाचे प्रमाण नक्कीच कमी होईल. विवाहसंस्था आबाधित राहील.”- ऍड. शिवाजीराव देशमुख, जिल्हा व कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस
निकाली निघालेल्या दाव्यांचा आढावा
वर्ष परस्पर संमतीने घटस्फोट नांदण्यासाठीचे अर्ज
2021 1,362 1,691
2022 1,492 2,035
2023 625 765