कोणत्याही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे, ही अत्यावश्यक बाब मानली जाते. परंतु उद्योगनगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे चित्र आहे. औद्योगिक परिसरासह संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटीचे जाळे उभारण्यात यंत्रणांना अपशय आले आहे. या शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी चारही प्रमुख साधने उपलब्ध आहेत. लोकल, मेट्रो, एसटी आणि सर्वाधिक व्याप्ती असलेली पीएमपी ही चार साधने असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. पर्यायाने खासगी वाहतूक व्यवस्था किंवा खासगी वाहनांचा वापर अत्याधिक प्रमाणात होत आहे.
शहरातून मेट्रो धावत आहे परंतु ती पिंपरी ते फुुगेवाडी अशी केवळ जॉयराइड पुरती मर्यादित आहे. लोकल सेवा देखील गेल्या अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. लोकल रेल्वेसाठी ना ट्रॅक वाढविले जात आहेत ना फेऱ्या. शहराबाहेर जाण्यासाठी वल्लभनगर येथे एसटी स्थानक आहे परंतु राज्यासह देशात अनेक ठिकाणी जाण्यासाठी शहरवासियांना पुण्यापर्यंत जावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी देखील संपूर्ण शहरात अंतर्गत फेऱ्यांचे जाळे पसरु शकली नाही. सध्या पीएमपीला वेगवेगळ्या मार्गांवरील बससेवा बंद करण्यात रुची
दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहर वासियांच्या समोर आज वाहतूक कोंडी, पार्किंग, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वाढता इंधनाचा खर्च अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. या समस्या सुटाव्यात, असे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिांनाही वाटते. मात्र या सर्व समस्यांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे सार्वजनिक वाहतूक समक्ष करणे हे होय. नागरिकांनी पीएमपीच्या कारभाराबाबत अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे अधोरेखित केले आहे. गर्दीच्या वेळीच नाही तर मोकळी बस असतानाही थांब्यावर थांबत नाही. चालक-वाहन प्रवाशंची उद्धट वर्तन करतात. देखभाल दुरूस्तीच्या अभावी बस रस्त्यातच बस बंद पडतात. अशा असंख्य तक्रारींचा पाढा वाचकांनी वाचला. याशिवाय रेल्वेच्या कारभारावरही वाचकांची टीका केली. रेल्वेचा प्रवास स्वस्त असला तरी मुंबईप्रमाणे लोकल सेवा उपलब्ध झाल्यास प्रवासी संख्या वाढू शकते. मेट्रोचा सध्या पर्यटनापुरतीच मर्यादित केवळ राहिली आहे. मात्र भविष्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यवर तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे असावेत, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली. तसेच रिक्षा चालकांची मुजोरी, मीटर प्रमाणे भाडे आकारणी न करणे आदीबाबतही नागरिकांनी परखड मत व्यक्त केले. तसेच खासगी वाहतूकदारांना वाहतूक पोलिसांचे पाठबळ असल्याचे निरीक्षणही काही वाचकांनी नोंदविले आहे. वाचकांच्या या प्रतिक्रियांतून संबंधित बोध घेतील, अशी अपेक्षा बाळगूया.
मुंबई प्रमाणे लोकल सेवा हवी
लोणावळा ते पुणे रेल्वे लोकल सेवा किफायतशीर आहे. मुंबईप्रमाणे जर प्रत्येक पाच मिनिटांनी रेल्वे लोकल सेवा उपलबध केल्यास प्रवाशांची पहिली पसंती लोकल रेल्वे सेवा राहिल. तसेच नागरिकांचा सुरक्षित प्रवास होईल.
– राजेंद्र महाले
प्रवाशांशी योग्य वर्तन करावे
सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनातून प्रवास करीत असताना अनेकदा कर्मचाऱ्यांकडून वाईट वर्तणूक मिळते. त्यांनी प्रवाशांशी योग्य वर्तन करावे. खासगी वाहतूकदारांच्याही रोजी-रोटीचा प्रश्न असल्याने त्यांचाही विचार व्हावा.
– सनी गवई
रिक्षांना मीटरही सक्तीचे करावे
काही वर्षापूर्वी शहरात लोकसंख्या विरळ होती. त्यामुळे रिक्षांना परतीचे भाडे मिळत नसल्याने ते मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसे. आता लोकसंख्या वाढल्याने रिक्षांना मीटर सक्ती करावी.
-रमेश पाटील
सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी
शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक सक्षम होताना दिसत नाही. नियोजन करताना आगामी 30 वर्षाचे नियोजन करावे.
-गजाला सय्यद
नाइलाजास्तव खासगी वाहनांचा वापर
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नाइलाजास्तव नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात. भविष्याच्या दृष्टीने ते हिताचे नाही. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. – डॉ. शुभांकर वाघेरे
वेळेनुसार बसचे नियोजन करा
लोकसंख्या वेगाने वाढली त्यामुळे दळणवळणाची साधने कमी पडत आहेत. विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी सोयीस्कर अशा बसच्या वेळा असायला हव्यात. मात्र परिक्षेच्या काळात बसेसचे नियोजन करताना विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले पाहिजे.
-अरुणा मराठे
त्रिसुत्रीचा वापर करावा
सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करताना केवळ नफ्यात चालणाऱ्या मार्गाचा विचार करू नये. चालणे, सायकल, बसचा वापर या त्रिसुत्रीचा नागरिकांनी अवलंब केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतुकीचाही प्रश्न आपोआपाच सुटेल.
विशाल गडगे
मिनी बसची आवश्यकता
शहरातील मुख्य रस्त्यावरच बस धावतात. गल्ली बोळातून या बस जात नाही. जर सीएनजीवर चालणाऱ्या मिनी बसचा वापर केला तर सार्वजनिक वाहतूक सक्षम होईल आणि पीएमपीच्या खर्चातही बचत होईल. – मंगेश पाटील
सार्वजनिक वाहनांचा वापर करावा
वर्दळीच्या ठिकाणी गेल्यावर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच रिक्षा चालकांचीही मनमानी थांबावा.
– डॉ. सोमनाथ धोंडे
शहरात आल्यावर प्रवाशांची पहिला सामना रिक्षा चालकांशी होतो. मात्र काही रिक्षा चालक प्रवाशांना अरेरावी करतात. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन होते. रिक्षा संघटनांनीही रिक्षा चालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
-यशवंत कण्हेरे
प्रत्येक बसला जीपीएस प्रणाली बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर बसची माहिती मिळू शकेल. बसची वारंवारता वाढविल्यास अधिकजण बसने प्रवास करतील.
-आनंदा कुदळे
पुण्यातील बहुतांश मार्गावर थेट बससेवा असल्याने पेठांमधून बस जातात. तशी बससेवा पिंपरी चिंचवडमधील मार्गांवर नाही. अनेकदा प्रवास करताना इच्छीत स्थळी जाण्यासाठी दोनदा बस बदलावी लागते. शहरातील रिक्षा चालकांना आरटीओने बहुदा मीटरच दिलेले नसावे, असे वातावरण आहे.
-विलास पाडळे
काही खासगी कंपन्यांनी खासगी दुचाकी सेवा सुरू केली आहे. ही सेवा एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाचीही बचत होते. नाइलाजास्तव रिक्षा चालकांनी मनमानी सहन करावी लागत आहे.
– श्रीकृष्ण भोसले
जग पुढे चालले आहे. सध्याची तरूणाई सुविधायुक्त प्रवासाला प्राधान्य देत आहे. पुढची पिढी आपले स्टेट्स टिकविण्यासाठी खर्चाकडे बघत नाहीत. त्यामुळे नागरिक खर्चाकडे बघत नाहीत.
– विकास गर्ग
जादा पैशांसाठी रिक्षा चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. तसेच मनमानी भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट करीत आहेत.
– प्रमोद लांडे
पीएमपीचे कर्मचारी प्रवाशांशी उद्धट बोलतात आणि वागतातही. सुट्टे पैसे दिले नाही तर बसमधून खाली उतरवतात. तसेच बसचे वेळापत्रक थांब्यावर लावले असून त्यानुसार कधीच बस धावत नाहीत.
– किरण माने
ओला-उबेर या सारख्या कंपन्यांची वाहतूक किफायतशीर आहेत. तर त्यांनी जादा दर आकारून प्रवाशांची लूट केली असती तर त्यांचे वाहतुकीचे जाळे एवढे विस्तारले नसते. आपल्याकडील सार्वजनिक वाहतुकीलाही अशाच प्रकारचे नियोजन हवे आहे.
– किरण जाधव
पीएमपीच्या बसमध्ये नियमानुसार केवळ 17 प्रवासी उभे राहू शकतात. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. चेंगराचेंगरीमुळे प्रवशांचा प्रवास सुटसुटीत होत नाही. नाईलाजास्तव प्रवाशांना रिक्षाने प्रवास करावा लागतो.
-शिवराज घोरपडे
परिवहन सेवेसाठी वेगळी पीएमपीएमएल ही वेगळी कंपनी करूनही रडगाने सुरूच आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठीचेही नियोजन होणे गरजेचे आहे.
-विशाखा नागोसे
पीएमपीने मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारणी केली आहे. त्यामुळे इच्छा असूनही बसने प्रवास करीत नाही. तर तिकीट दर कमी केल्यास निश्चितच प्रवासी संख्या वाढून महसूलातही वाढ होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्नही आपोआप मिटेल.
-ज्योति निंबाळकर
खासगी आणि सरकारी कंपनीतील कर्मचारी यांना सार्वजनिक वाहतूक असलेल्या बसमधून प्रवास करणे सक्तीचे करावे. त्यामुळे इंधन आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. मात्र वाहतूक कोंडी होणार नाही आणि रिकाम्या बस धावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. -भास्कर म्हस्के
पीएमपीचे ठेकेदार मनाला वाटेल तेव्हा संप करतात. ठेकेदाराची ही मनमानी थांबविणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक आगारात 50 टक्के बस या पीएमपीच्या मालकीच्या असाव्यात.
– संतोष शिंदे
नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची इच्छा आहे. मात्र मेट्रोच्या स्टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना खासगी वाहनांचाच वापर करावा लागतो. मात्र खासगी वाहन पार्क करण्यासाठी मेट्रो स्टेशनजवळ ठिकाण नाही. पार्किंग उपलब्ध झाल्यास सार्वजनिक वाहनांचा वापर वाढेल.
– ऍड. दत्ता झुळूक
सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास अनेक समस्या सुटतील
वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदूषण आणि वाढता खर्च अशा अनेक समस्या आपल्यापुढे आहेत. मात्र त्यावर एकच उपाय आहे की सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. पीएमपीएच्या बसचा वापर करणे वाढल्यावर इतर समस्या आपोआप सुटतील
– ज्ञानेश्वर पुदाले
रगेल चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच झाल्यास बेशिस्तीला आळा बसेल. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.
-मजीद शेख
प्रवासी भाडे मर्यादित ठेवून वेळेत वाहतूक सुरळीत ठेवल्यास प्रवासी स्वतःचे वाहन वापरण्या ऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करतील. तसेच नागरिक आणि पीएमपीच्या चालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. – मंजुषा कारंडे
प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस आणि मेट्रोचे दर कमी केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक स्वस्त झाल्यास नागरिक खासगी वाहनांचा वापर करणार नाहीत. त्यामुळे पार्किग आणि वाहतूक कोंडीचाही प्रश्न मार्गी लागेल. – पूनम फाळके
प्रवाशांना केंद्रस्थानी ठेऊन पीएमपीने नियोजन केलेले नाही. ज्याला जे योग्य वाटेत तसे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रवासी विना थांबा, विना बस आहे तिथेच आहे. अधिकारी व राजकीय नेते केवळ शहरात येऊन उद्घाटन करून जातात.
-वि. रा. कमळापूरकर
सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करताना नफा किंवा तोट्याचा विचार करू नये. फेऱ्या अधिक असल्यास जास्तीत जास्त प्रवासी बसकडे वळतील. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा विषय आपोआपच निकाली निघेल. – प्रणव उंडे
सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन नसल्याने तसेच बेभरवशाची सेवा असल्याने नाइलाजास्तव 75 टक्के नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात. याउलट चित्र मुंबईत आहे. तिथे 75 टक्के नागरिक रेल्वे लोकल आणि बेस्टच्या बसचा वापर करतात. – मनिषा परांडे
शहरातील अनेक भागांमध्ये थांबा असूनही बस थांबत नाहीत. तसेच काही ठिकाणी अजिबात वर्दळ नाही अशा ठिकाणी थांबा दिला आहे. अशा चुका टाळायच्या असतील तर पीएमपीने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. – राहूल कोल्हटकर
अनेकजण कामावर जाताना एका व्यक्तीसाठीही चारचाकी वाहनांचा वापर होत असून तो एकप्रकारे गैरवापरच आहे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करावा किंवा चार सहकारी सोबतीला घेऊन खासगी वाहनाने प्रवास करावा.
– पंकज शर्मा
शासकीय वाहने वेळेवर येत नसल्याने अनेकजण खासगी वाहनांकडे वळतात. तसेच रिक्षाने प्रवास करायचा झाल्यास त्या मीटरप्रमाणे नसतात. तसेच रिक्षातील प्रवास सुरक्षित वाटत नाही. – अंकुश पवार
सर्वसामान्य नागरिक सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. खासगी वाहन चालकांकडून होणारी लूट पीएमपी प्रशासन थांबवू शकते. मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. – मधुकर बच्चे
लोकसंख्या वाढत चालली आहे तशी प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत बसच्या संख्येत वाढ होत नसल्याने सार्वजनिक वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे.- भावना क्षीरसागर
पीएमपीने तिकीट दर अतिशय कमी करावेत. जेणेकरून प्रवाशाला लांब जायचे असल्यास त्यांनी आपले वाहन पार्क करून बसने प्रवास करेल. तसेच खासगी वाहनांच्या दरावर शासनाचे नियंत्रण असावे. यलप्पा वालदोर
आरामदायी वाहतूक हवी
सार्वजनिक वाहतूक आरामदायी असल्यास प्रवासी संख्या वाढेल. मात्र विनाथांबा एसटी प्रमाणे पीएमपीनेही विनाथांबा बस सुरू केल्यास त्यास अधिक प्रतिसाद तर मिळेलच. तसेच जलद वाहतूकीमुळे प्रवासाच्या वेळेतही कपात होईल.
सुनंदा जाधव
स्वस्तात प्रवास होत असल्याने प्रवाशांची ओढ रेल्वेकडे आहे. मात्र रेल्वे लोकलची सेवा वाढविणे गरजेचे आहे. दर अर्धा तासाने लोकल सेवा उपलब्ध केल्यास प्रवाशांचा अधिक प्रतिसाद मिळेल.
-यशवंत चासकर
पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रशासन आणि राजकीय मानसिकता बदलण्याची गरज आहे. समस्येकडे आपलेपणाने पाहिल्यास त्या सहज सुटतील.
-राजकुमार शेडगे
रेल्वेतून उतरल्यावर इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागतो. ते मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करतात. तर रेल्वेला बसची कनेक्टिव्हिटी ठेवल्यास रिक्षाचा नाहक भूर्दंड बसणार नाही आणि पीएमपीचेही उत्पन्न वाढेल.
-अनिता धाक्रस