“ट्विटर’ या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रसार जगातील बहुतांश देशात झालेला आहे. आजघडीला ट्विटरचे जगभरात सुमारे 40 कोटी यूजर असून त्यातील अडीच कोटी यूजर भारतातीलच आहेत. सध्या ट्विटर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या पातळीवर व्यापक फेरबदल झाले आहेत. ऍलन मस्कने ट्विटरची “चिमणी’ ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याच्या शक्यता आहेत. त्यामध्ये मुक्तपणा किती असेल आणि व्यावसायिकता किती असेल हे येणारा काळच सांगेल. परंतु ऍलन मस्कसारखा उद्योगपती कर्ज काढून एखादी कंपनी खरेदी केल्यानंतर नफाकेंद्री धोरणेच राबवणार, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. मात्र भारतीयांची केली जात असलेली हकालपट्टी, ही बाब धक्कादायक असून मस्क यांच्या अनपेक्षित कृतीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सध्याच्या काळात इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल स्पेस अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत असल्याने ट्विटरचा करार हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. ऍलन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला अन ट्विटरला नव्याने वलय प्राप्त झाले. ट्विटरची मालकी येताच ऍलन मस्कने “चिमणी मुक्त झाली’ (द बर्ड इज फ्रीड) असे ट्विट केले. या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
मानवतेच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी ट्विटरचा ताबा घेत असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. विचार न करता मत मांडणाऱ्या अविचारी लोकांनी ट्विटरच्या प्लॅटफॉर्मचा वापर करू नये, अशी मस्क यांनी अपेक्षा व्यक्त केली. ट्विटरचा उपयोग करण्यासाठी आता पैसे देखील मोजावे लागतील. ट्विटरच्या धोरणात कालांतराने व्यापक बदल पाहवयास मिळू शकतात.
13 एप्रिल रोजी ऍलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली. मात्र स्पॅम आणि फेक अकाऊंट्समुळे ट्विटर खरेदीचा करार स्थगित केला. त्यानंतर 8 जुलै रोजी मस्क यांनी करार तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ट्विटर कंपनीने मस्क यांच्या निर्णयाचा विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. पण ऑक्टोबर महिन्यांत मस्क यांनी आपली भूमिका बदलली आणि करार पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. यादरम्यान 28 ऑक्टोबरपर्यंत करार पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
ऍलन मस्क यांनी ट्विटरच्या कार्यालयात एक दिवस अगोदरच पाऊल टाकले, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मस्क यांनी ट्विट करत म्हटले, की ट्विटरशी करार करण्यामागचा उद्देश म्हणजे आगामी पिढीला कॉमन डिजिटल स्पेस मिळणे होय. या व्यासपीठावर अनेक विचारसरणीचे लोक कोणत्याही हिंसेशिवाय निकोप चर्चा करतील, अशी अपेक्षा मस्क यांनी व्यक्त केली. कारण भविष्यात ट्विटर हे डावे आणि उजव्या विचारसरणीच्या समर्थकांसाठी एक व्यासपीठ ठरू शकते आणि या माध्यमातून द्वेष पसरविण्याची भीती राहू शकते.
विशेष म्हणजे ट्विटरवर उपलब्ध असणारे साधनं हे यूजरला चांगल्या रितीने दिसावीत अशा प्रकारचे क्रमावली (अल्गोरिदम) ऍलन मस्क हे तयार करु इच्छित आहेत. ट्विटरवर असलेल्या स्पॅम बोट्सला मस्क काढण्याची मस्क यांची तयारी आहे. अर्थात मस्क यांनी ट्विटर व्यवस्थापनाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्ययोजना तयार केलेली नाही किंवा जारी केलेली नाही. आपण केवळ नोटा छापण्यासाठी ट्विटर ताब्यात घेतलेले नाही, असे मस्क म्हणतात.
मानवतेच्या मदतीसाठी ट्विटर खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मस्क यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तिय अधिकारी नेड सेगल आणि कायदा व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांना बाहेरचा रस्ता दाखविला. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्याला ट्विटरवरील फेक अकाउंटच्या संख्येवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मस्क यांनी केला आहे. त्यामुळे मस्क यांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पराग अग्रवाल यांना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीचे सह संस्थापक जॅक डोर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरचा सीईओ म्हणून नियुक्त केले होते.
प्रत्यक्षात गेल्या काही काळापासून जग हे कट्टरपंथी आणि डाव्यात विभागले गेले आहे. मस्क यांनी म्हटले की, जगात सामाजिक सद्भाव वृद्धिंगत होण्यासाठी सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. या व्यासपीठावर कोणत्याही हिंसेचा आधार न घेता लोक आपले म्हणणे मांडतील. सध्याच्या काळात जगाला अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यात सोशल मीडियावर चालणारे टोकाचे वैचारिक युद्ध याचाही समावेश करावा लागेल.
सध्या इंटरनेट मीडिया हे कट्टरपंथीय आणि डाव्या विचारसरणीत विभागला गेला आहे. दोन्ही गटांचे कट्टर विचार हे केवळ समाजाला विभागत नाही तर द्वेष देखील पसरविण्याचे काम करत आहे. अशा प्रकारची शक्यता पाहता भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था मस्क तयार करू इच्छित आहेत. या व्यासपीठावर सर्वाचे स्वागत व्हावे आणि सर्वांना बिनधास्तपणे आपले म्हणणे मांडता यावे, असे मस्क म्हणतात. ट्विटर हे जगातील जाहीरातीचे आदर्श व्यासपीठ व्हावे, असे मस्क यांनी जाहीरातदारांना म्हटले आहे.
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर भारताचे आयटी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, ट्विटर हा भारतातील नव्या आयटी नियमांचे पालन करेल, असा ठाम विश्वास आहे. ट्विटरचा मालक बदलला असला तरी फरक पडणार नाही. भारताचे स्वत:चे कायदे आहेत आणि त्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल. काही ट्विटर खाते बंद केल्याच्या निर्णयाबाबत बोलताना चंद्रशेखर म्हणाले, की, यासंदर्भात लवकरच आयटी कायदा लागू केला जाईल आणि त्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल.
वास्तविक भारत सरकारने ट्विटरला जुलै महिन्यांत आक्षेपार्ह मजकूर काढण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टातही गेले होते. यानुसार ट्विटरने आपल्या व्यासपीठावरून आक्षेपार्ह मजकूर काढण्याची तयारीही दर्शविली होती. कृषी कायदे, करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून होणारे प्रयत्न आणि स्वतंत्र शिख राज्यांबाबत ट्विटरवरून चुकीची माहिती पसरविण्यात आली होती. सरकार आणि ट्विटर यांच्यात बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू आहे. आता ट्विटरचा मालक बदलल्याने या सोशल मीडियाची भूमिका काय राहते, हे आगामी काळात समजेल. या करारानंतर ट्विटर डावे आणि कट्टरपंथीय ंयांच्यात कसा ताळमेळ कसे बसवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मस्क यांनी “ट्विटर’मधून कमाई करण्यासाठी ब्लू टिकची इच्छा बाळगून असणाऱ्यांकडून शुल्क वसुलीचे संकेत दिले आहेत. डॉलरमध्ये त्याचे मासिक शुल्क निश्चित केले आहेत. या हिशोबाने भारतातील यूजरना सुमारे 1600 रुपये खर्च करावे लागतील. अर्थात ब्लू टिक असलेले आणि ब्लू टिक घेण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या भारतीय मंडळींनी एवढे पैसे मोजण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. अशावेळी ट्विटरचे कामकाज कशा रितीने चालेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
– महेश कोळी