पिपरी – प्रशासकीय गुंतागुंतीत मृतप्राय झालेल्या झाडांना जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी रावेत येथील मेट्रो इको पार्कमध्ये पोलीस बंदोबस्तात झाडांना पाणी दिले. पार्कच्या बाहेरुन पाइपने सुमारे १० ते १२ टॅंकर पाणी सोडण्यात आले. शनिवारी व रविवारी अशी दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. त्यात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.
मेट्रो इको पार्कमधील झाडांची देखभाल व्हावी, हे पार्क सर्वसामान्यांसाठी उघडले जावे, येथील पर्यावरण संपदा वाचावी, अशी वारंवार मागणी करूनही जिल्हाधिकारी कार्यालय याकडे दुर्लक्ष करत आहे. पाणी न मिळाल्याने येथील अनेक झाडे मेली आहेत आणि शेकडो झाडे मरणासन्न अवस्थेत आहेत. तरी देखील कुलूप उघडून पाणी देऊ दिले जात नाही. अखेर पर्यावरणप्रेमींनी टॅंकर मागवून बाहेरुन पाणी आत सोडले.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
रावेत येथील मेट्रो इको पार्क बचाव समितीच्या कार्यकत्यांनी स्वखर्चाने टँकर मागवून बाहेरूनच पाइपद्वारे पाणी आत सोडले. मेट्रो इको पार्क बचाव समितीचे प्रशांत राऊळ म्हणाले की, मेट्रो इको पार्कच्या तयार करताना या जागेत काही तळी तयार करण्यात आली आहेत. त्याचा उपयोग भूजल पातळी वाढण्यासाठी होतो.
याचा अभ्यास करुन आम्ही या तळ्यांमध्ये जाईल, या हिशोबाने आम्ही पाणी दिले. मात्र, हे एकदा करून उपयोग नाही. दर आठवड्याला झाडांना पाणी मिळाले तरच ती भविष्यात टिकू शकतात. सध्या अनेक नागरिक टँकरचा खर्च उचलण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, हे पार्क आणि येथील झाडे वाचविणे गरजेचे आहे.