पिंपरी – बीआरटीएसमधून पीएमपीएमएल ऐवजी इतर वाहन चालकच आपली वाहने अधिक घुसवत आहेत. त्याचा पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएलला अडथळा होत आहे. वाहने समोर उभी असल्याने बीआरटीसाठीचा सिग्नल सुटूनही बसला पुढे जाता येत नाही. इतर वाहनांचा सिग्नल सुटल्यानंतर बस पुढे जाते. पीएमपीचालकांना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक सिग्नलवर या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच बसला उशीर का झाला या बाबत पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडून देखील नोंद ठेवून पुढील कार्यवाही केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटी नियोजनाचा बोजवाराच उडाला आहे. अनेक ठिकाणी बीआरटी मार्गांचे नियोजन फेल गेले आहे. तर काही ठिकाणी बीआरटीएस मार्ग तयार करण्यात आले असून ते बंदच ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हे मार्ग सुरू आहेत. त्या ठिकाणी बेशिस्त वाहनांची भर पडली आहे. लवकर जाण्यासाठी अनेक वाहनचालक बीआरटीमधून वाहने चालवित आहेत. शहरातील मुख्य चौकातील सिग्नल जवळ ही वाहने थांबल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएलला पुढे जाता येत नाही. इतर वाहनांच्या अगोदर बीआरटीचा सिग्नल लवकर सुटतो. मात्र समोर वाहने उभी असल्याने पीएमपीएमएलला पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
थोड्या वेळाने इतर सिग्नल सुटल्यानंतर पीएमपीएमएलला पुढे जाताना इतर वाहनांचा अडथळा येत आहे. रस्त्यामध्येच वाहतुकीचा खोळंबा देखील होत आहे. परिणामी नियोजित वेळेत पुढे जाण्याला पीएमपीएमएलला अडचणीच येत असल्याचे दिसते. या बेशिस्त वाहनचालकांना आवर कोण घालणार असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक बस निघण्याचे आणि पोचण्याची वेळ निश्चित करून दिली असते. मात्र या अडथळ्यांमुळे बसला पोचण्यात उशीर होत आहे. परिणामी लेटमार्कला सामोरे जावे लागत आहे.
बीआरटीतून येणाऱ्या बसमुळे अपघाताच्या शक्यता
निगडीवरून पिंपरी-चिंचवडकडे ग्रेडसेपरेटर मधून येताना मोरवाडी चौकात जाण्यासाठी डाव्या बाजुला वाहनधारक वळण घेत आहेत. या वेळी पाठीमागून बीआरटी मार्गातून पीएमपीएमएल येत असताना वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या शक्यता निर्माण होत आहे. याचप्रमाणे निगडीकडून येणाऱ्या बीआरटी बस पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात यू टर्न घेणाऱ्या वाहनचालकांना मेट्रोच्या खांबांमुळे दिसतच नाहीत. चुकीच्या नियोजनाने वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे.
बेशिस्तीवर कारवाई कोण करणार ?
आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलचा कार्यभार घेतल्यानंतर बीआरटीमधून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच बीआरटी मार्गाजवळ वॉर्डनची देखील नेमणूक करण्यात आली होती. मात्र सध्या हे वॉर्डन दिसेनासे झाले आहेत. तसेच या मार्गातून मोठ्या प्रमाणातून वाहने जात असतानाही वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाहीत. त्यामुळे बीआरटी मार्गातून जाणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.