भाष्य (संदीप घिसे) – खून, मारामाऱ्या, दरोडे, महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून पिंपरी चिंचवड शहराची क्राइम सिटीकडे वाटचाल सुरू दिसून येत आहे. एकेकाळी पेन्शनरचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात सुरक्षित असलेले ज्येष्ठ नागरिक आता चोरटे आणि तोतया पोलिसांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यांना भिती किंवा आमिष दाखवून भरदिवसा, भररस्त्यात हातोहात लुटण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दफ्तरी दाखल होत असल्याच्या गुन्ह्यांवरून हे सत्य समोर येत आहे. विशेष म्हणजे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एकीकडे हाणामारी, घरफोडी, महिलांवरील अत्याचार यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तरी दुसरीकडे वृद्ध नागरिक देखील सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. दापोडी परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्धेला “आमच्या शेठला 12 वर्षांनी मुलगा झाला असून त्यानिमित्त साड्या वाटप करीत आहोत. तुम्ही गरीब दिसाव्यात यासाठी तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा’, असे सांगत बोलण्यात गुंतवून अंगावरील दागिन्यांची लूट केल्याची घटना बुधवारी (दि. 30) समोर आली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याच दिवशी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच भोसरी येथेही अशाच प्रकारे बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेला लुबाडण्यात आले.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये एका 72 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 26 नोव्हेंबर रोजी त्यांना एका चोरट्याने गाठले. दिवाळीमध्ये तुम्ही केलेल्या खरेदीला अडीच तोळे सोन्याचे बक्षिस लागल्याचे सांगत दुचाकीवर बसून आडबाजूला नेले. तिथे तिला बोलण्यात गुंतवणून तिच्या अंगावरील दागिने चोरून नेले.
गुन्हे शाखेतील पोलीस असल्याची बतावणी करून लुटले
आम्ही पोलीस आहोत. पुढे खून झाला आहे, त्यामुळे तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगत वृद्ध महिलांना लुटल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना कधी वीजेचे बिल भरले नाही म्हणून ऍप डाऊनलोड करण्यास सांगून लुबाडले आहेत तर कधी तुमच्या एटीएमचे पॉइन्ट वाढवून देतो, असे सांगत लुटण्यात येत आहे. वृद्ध नागरिकांच्या अंगावर दागिने ठेवू नका, असे आवाहन पोलिासांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.