पिंपरी – वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पिंपरी-चिंचवड महापालिका शहरामध्ये सेंट्रल फायर स्टेशन उभारणार आहे. त्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासी व्यवस्था, परेड मैदान, स्विच स्टेशन, जलतरण तलावासह वाहन दुरुस्ती कार्यशाळा असणार आहे.
शहराला लागून भोसरी, चाकण, तळेगाव, रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा भाग वाढत आहे. भविष्याचा विचार करुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सेंट्रल फायर स्टेशन उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प पाच एकर जागेत विकसित केला जाणार आहे. त्यासाठी पिंपरीतील महिंद्रा आणि चिंचवडमधील प्रिमियर कंपनीच्या नियोजित जागेपैकी एका कंपनीच्या जागेची निवड केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर असून याबाबत अंतिम निर्णय काही दिवसांत घेतला जाणार आहे.
सेंट्रल फायर स्टेशनसाठी 200 कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाणार आहे. हे फायर स्टेशन 24 तास कार्यरत राहणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी राहण्याची सोय असणार आहे. त्यासाठी 300 क्वार्टर्स बांधले जाणार आहेत. अग्निशामक वाहनांसाठी 400 स्विच स्टेशन तयार केली जाणार आहेत. जलतरण तलाव, वाहन दुरुस्तीसाठी स्वतंत्र कार्यशाळा, सरावासाठी मैदान विकसित केले जाणार आहे. तब्बल 210 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून पुढील दोन वर्षात तो पूर्ण केला जणार आहे.
वाहनांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ होणार
अग्निशामक विभागाचे पिंपरी, भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, तळवडे, चिखली, थेरगाव व मोशी हे 8 केंद्रे आहेत. यामध्ये 28 अग्निशामक वाहनांच्या माध्यमातून तीन शिफ्टमध्ये 24 तास अखंड अग्निशामक सेवा कार्यरत आहे. अग्निशामक सेवा भारत सरकारच्या निकषानुसार शहरी भागासाठी 10 कि. मी. परीघ क्षेत्रामागे एक अग्निशामक केंद्र अशा प्रकारे 18 अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे. नव्याने 10 केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 70, 54 आणि 32 मीटर उंचीची परदेशी बनावटीची 3 वाहने, सहा हजार लिटर क्षमतेचे 6 फायर टेंडर, फ्लड रेस्क्यू 1, 18 हजार लीटर क्षमतेचे वॉटर कॅनन 3, बीए सेट व्हॅन 1, डीसीपी टेंडर 1, फोम टेंडर 1, ऍडव्हान्स रेस्कयू व्हॅन 2 अशी 80 कोटींची 18 वाहने खरेदी केली जाणार आहेत. सेंट्रल फायर स्टेशन तयार झाल्यानंतर आवश्यकतेनुसार वाहन खरेदी केली जाईल. तत्पुर्वी, होणारी वाहन खरेदी पुरेसी असल्याचे अग्निशामक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रस्तावित सेंट्रल फायर स्टेशनचे आयुक्तांसमोर नुकतेच सादरीकरण केले. शहराची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारा विकास पाहता भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात सेंट्रल फायर स्टेशन उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महिंद्रा आणि प्रिमियर कंपनीच्या जागा विचारात आहेत. औद्योगिक वसाहतीबरोबरच हिंजवडी आयटी पार्कचा विचार करुन हे फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे.
-विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त