पिंपरी – आयटी पार्कमध्ये नोकरी करुन उच्चभ्रू जीवनशैली जपणाऱ्या लोकांसाठी महापालिकेने पिंपळे सौदागरसह काळेवाडीमध्ये विस्तारित क्षेत्रफळावर अलिशान उद्याने विकसित केली आहेत. मात्र, उद्यान विभागाचे दुर्लक्ष, प्रशासनाचा लहरीपणा आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे उद्यानाची पुरती वाट लागली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच उद्यानातील लहान झाले वाळून जाऊ लागली आहेत. तर गवतही कोमेजून गेले आहे. उद्यानांच्या देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही उद्यानांच्या झालेल्या दुरावस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा वर्ग पिंपळे सौदागर येथे राहतो. त्यामुळे पिंपळे सौदागरचा विकास झपाट्याने झाला. उच्चभ्रू जीवनशैली जपणारी लोकं याठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, पालिकेचे केवळ कर वसुलीवर लक्ष असून जमा करण्यात आलेल्या रक्कमेची उधळपट्टी सुरू आहे. मात्र, सर्वसामान्यांना सुविधा देण्यात कुचराई केली जात आहे. नागरिकांना विरंगुळा घेण्यासाठी अथवा सकाळी किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी पालिकेने लिनिअर गार्डन विकसित केले. हे उद्यान चोवीस तास खुले असते. उद्यानात वॉकींग ट्रॅक, जॉगींग ट्रॅक, व्यायामासाठी ओपन जीम, लहान मुलांसाठी झोके, फिरते झुले, गसरगुंडी, ऍडव्हेंचर नेट आदींची रचना केली आहे. त्यासोबतच झाडे, पृष्टभागावर हिरवे गवत, बाड असल्यामुळे सर्वत्र हिरवाई असते. मात्र, काही दिवसांपासून उद्यान विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने या ठिकाणची झाडे व गवत वाळून जाऊ लागले आहे. उद्यानातील हिरवाई नष्ट होऊ लागली आहे. ओपन जीममधील व्यायामाचे साहित्य मोडकळीस आले आहे. काही साहित्य तर मोडून पडले आहे.
मद्यपींचा उच्छाद
ज्योतिबा उद्यानात पवना नदीपात्रालगत सुरक्षा भिंत अथवा कंपाऊंड बनविण्यात आले नाही. त्यामुळे पाठीमागून नागरिकांना सहज प्रवेश करता येतो. हे उद्यान सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ यावेळी खुले असते. मात्र, उद्यानाच्या मागील बाजूने दारुडे बिनदिक्कतपणे प्रवेश करत आहेत. दिवसभर या दारुड्यांनी उद्यानाला मध्यपींचा अड्डा बनविला आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आली असून उद्यानात दारु, कोल्ड्रींग्जच्या बाटल्या आणि प्लास्टीक ग्लासचा अक्षरश: खच पडला आहे. दारु पिण्यास मनाई केल्यास सुरक्षारक्षकाला मारहाण केली जाते. त्यामुळे हे उद्यान दारुड्यांचा अड्डा बनले आहे.
ज्योतिबा उद्यानाचीही दूर्दशा
काळेवाडीतील ज्योतिबा उद्यानाची अवस्था लिनिअर गार्डनपेक्षाही वाईट झाली आहे. या उद्यानात वॉकींग करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. मात्र, या उद्यानाला पवना नदीपात्रालगत सुरक्षाभिंत अथवा मजबूत कंपाऊंड नाही. त्यामुळे उपद्रव माजवणारे तरुण या उद्यानात दिवसभर तळ ठोकून असतात. उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असताना हे तरुण समोरील बाजुच्या कंपाऊंडवरून उड्या ठोकून आत प्रवेश करतात. तर, नदीपात्रालगतच्या बाजुने कसल्याच प्रकारचे कंपाऊंड नसल्यामुळे “आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती झाली आहे.
कृत्रीम धबधब्याची मोडतोड झाली आहे. हा धबधबा सध्या बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याची उपलब्धता असूनही ते वेळवर झाडांना सोडले जात नाही. नागरिकांना पिण्यासाठी बसविण्याते आलेल्या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. काही नळ मोडून पडले आहेत तर अनेक नळ चोरून नेले आहेत. या संपूर्ण अवस्थेला उद्यान विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप येथील नागरिकांमधून होत आहे.