पिंपरी -ओडीसा, आंध्र प्रदेशमधून गांजा, राजस्थान आणि पाकिस्तान सीमेवरून अफिम, मुंबई आणि इतर ठिकाणाहून ब्राऊन शुगर विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरात धडाकेबाज कारवाया केल्या. अंमली पदार्थ विरोधी पथकाने 81 कारवायांमध्ये 154 जणांना अटक करत त्यांच्याकडून गांजा, ब्राऊन शुगर, अफिम, डुडा चुरा असा दोन कोटी 18 लाख 54 हजारांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
ओडीसा, आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणमच्या आजूबाजूच्या जंगल परिसरात गांजाची बेकायदेशीरपणे शेती केली जाते. तिथले स्थानिक आदिवासी गांजाची शेती करून तो एक ते दोन हजार रुपये प्रती किलो प्रमाणे गांजा व्यापाऱ्यांना विकतात. ते व्यापारी त्यांच्या हस्तकांना चार ते पाच हजार रुपये प्रती किलो प्रमाणे विकतात. व्यापाऱ्यांचे हस्तक देशभरातील विविध शहरात जाऊन तब्बल 25 ते 30 हजार रुपये किलो प्रमाणे या गांजाची विक्री करतात. शहरातील हस्तक प्रत्यक्ष जाऊन तर कधी मध्यस्थी मार्फत गांजा मागवतात.
राजस्थान आणि पाकिस्तान सीमेवर खसखसचे पिक घेतले जाते. खसखसची शेती करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. राजस्थानमधील काही शेतकरी अवघ्या काही क्षेत्राची परवानगी घेऊन मोठ्या क्षेत्रावर खसखस पिकवतात. हे पिक फुलोऱ्यात आल्यानंतर त्याचा चिक काढून त्यापासून अफिम बनवले जाते. त्यावर प्रक्रिया केल्यास त्याची ब्राऊन शुगर बनते. ब्राऊन शुगरवर प्रक्रिया केल्यास वेगळा अंमली पदार्थ तयार होतो. खसखस पिकाच्या बोंडांना अफूची बोंडे म्हटले जाते. ही सुकलेली बोंडे काही प्रमाणात रात्रभर पाण्यात भिजत घालायची आणि सकाळी ते पाणी गाळून पिल्यास नशा होते. अधिक श्रमाची कामे करणारे कामगार याचे सर्वाधिक सेवन करतात. राजस्थान मधून येणारे ट्रक आणि मालवाहू वाहनांमध्ये टाकून अफू शहरात येतो.
मात्र यावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस नजर ठेऊन आहेत. सन 2021 मध्ये 59 गुन्ह्यांमध्ये 111 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 175.307 किलो गांजा, 18 ग्राम चरस, 90.85 ग्रॅम ब्राऊन शुगर असा 69 लाख 53 हजार 89 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तर सन 2022 मध्ये 81 गुन्ह्यांमध्ये 154 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 613.717 किलो गांजा, 133 ग्रॅम ब्राऊन शुगर, 808 ग्रॅम अफिम, 115.141 किलो डुडा चुरा असा दोन कोटी 18 लाख 54 हजार 825 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा सेवन प्रकरणी 31 गुन्ह्यात 53 जणांना अटक करून त्यांच्याकडून 241 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
तीन महिलांवर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई
निगडी मधील ओटास्कीम येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखांनी एकाच वेळी ओटास्कीम परिसरात छापे मारले. त्यात तीन महिलांवर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली. तर तिघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विक्रीसाठी गांजा पुरविणाऱ्या मुख्य डीलरपर्यंत पोहोचून त्यास अटक करून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ती साखळी नष्ट केली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या 10 जणांना वर्षभरात तडीपार करण्यात आले.
नष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु
जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट केला जातो. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पंचांच्या समक्ष सर्व अंमली पदार्थ नष्ठ केले जातात. अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. न्यायालयाकडे अर्ज केल्यानंतर ठिकाण आणि वेळ निश्चित केली जाते. पुरेशी सुरक्षा आणि उंच बॉयलर असणाऱ्या कंपनीत हे अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत.