पिंपरी – प्रत्येक सणा-वाराला शहरातील विविध भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होतो. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळीत हे प्रकार वारंवार घडतात. महावितरणने या दिवाळीतही धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ही परंपरा कायम ठेवली. नवी सांगवी, चिंचवड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, प्राधिकरण, किवळे आदी परिसरात रात्री दहा वाजल्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला. त्यानंतर पहाटेपर्यंत हेच सुरू होते. तर, पहाटे याच परिसरात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे दोन लाख 19 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
दिवाळी हा प्रकाशाचा सण. चैतन्यमय या सणाला उत्साह असतो. नागरिक घर आणि आंगण आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई करात. परंतु, महावितरणने वीज पुरवठा खंडित करत यंदाही दिवे विझविले. धनत्रयोदशीला अनेक व्यावसायिक चोपडी पूजन करतात. मात्र, रात्री शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्री अनेकांनी मोबाइल, सोलार पॅनेल व इतर दिव्यांच्या प्रकाशाचा आधार घेत पूजा केली. तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही कमी प्रकाशात खरेदी करवी लागत होती. अनेकजण वीजेअभावी परत माघारी गेले. त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला.
महावितरणने केवळ अंधार केला नाही तर दिवाळीच्या सणासाठी अहोरात्र कष्ट करत असलेल्या अनेक महिला व्यावसायिक, शिंपी यांनाही अडचणीत आणले. रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने शुक्रवारी रात्रभर जागून अनेक महिला व्यावसायिक फराळाच्या ऑर्डर पूर्ण करत होत्या. तर लक्ष्मीपूजनापूर्वी नागरिकांचे कपडे शिवून देण्यासाठी शिंपी देखील काम करत होते. या सर्वांचे काम थांबवून महावितरण त्यांना प्रचंड मनस्ताप घडवून आणला. नवी सांगवी परिसरात अनेक महिला फराळाच्या ऑर्डर घेतात. नागरिकांना ताजा फराळ मिळावा, यासाठी एक-दोन दिवस आधी तयार करतात. मिठाई व्यावसायिक देखील एक ते दोन दिवस आधी मिठाई तयार करतात.
महावितरण नुकसानभरपाई देणार का?
देशात सर्वाधिक महाग वीज विकणाऱ्या यंत्रणेपैकी एक असलेले महावितरण बिल भरण्यास उशीर झाल्यास दंडही आकारते आणि वीज पुरवठाही खंडित करते. तसेच सुरक्षा ठेवीच्या नावाखाली अतिरिक्त पैसेही उकळत राहते. एवढे करुनही नियमित सेवा देत नाही. महावितरणमुळे सातत्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसानही होत असते. तर महावितरण नुकसान भरपाई देणार का? लोकांकडून दंड वसूल करणाऱ्या महावितरणवर दंडात्मक कारवाई कोण करणार? असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मग खासगीकरणाला विरोध का?
महावितरणमुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. महागडी वीज विकणारे, ग्राहकांनी विकत घेतलेल्या आणि स्वत:च्याच जागेत लावलेल्या मीटरचेही भाडे घेणारे महावितरण एवढे पैसे घेऊनही जर सणासुणदीच्या काळात नियमित आणि व्यवस्थित सेवा सुविधा देऊ शकत नसेल तर खासगीकरणाला महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी विरोध का करतात? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.